वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:36 IST2021-09-15T04:36:06+5:302021-09-15T04:36:06+5:30
नंदुरबार : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन किंवा एक महिन्यासाठी निलंबित करण्याची कारवाई जिल्ह्यात नियमितपणे केली जात आहे. ...

वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!
नंदुरबार : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन किंवा एक महिन्यासाठी निलंबित करण्याची कारवाई जिल्ह्यात नियमितपणे केली जात आहे. यानंतरही नियम मोडणारे मात्र धडा घेत नसल्याचे चित्र आहे.
नंदुरबार शहरात वाहतूक शाखा सातत्याने बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करत आहे. याअंतर्गत लायसन्स, कागदपत्रे नसलेले व अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई होत आहे. यात दंडात्मक कारवाईला प्राधान्य देण्यात येत आहे. परंतु वारंवार नियम मोडणाऱ्यांना समज देऊनही ते ऐकत नसल्याने त्यांचे वाहन परवाने निलंबनाचे प्रस्ताव दिले जातात.
हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन
शासनाच्या निर्देशांप्रमाणे वाहतुकीचे नियम कठोर केले आहेत. नियम न पाळल्यास आरटीओकडे परवाना निलंबनाचे प्रस्ताव पाठविले जात आहेत.
दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल जंपिंग यासह इतर नियम तोडल्यास वाहनचालक परवाना निलंबित होण्याची कारवाई केली जाऊ शकते.
तीन आणि एक महिन्यासाठी निलंबन
वाहतुकीचे नियम तोडल्यास कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबित केले जाते. वेळोवेळी नियमांचे उल्लंघन झाल्यास लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याचीही तरतूद नियमात असल्याची माहिती आरटीओने दिली.
अशी होते कारवाई...
पोलिसांच्या वाहतूक शाखेने केस दाखल केल्यानंतर लायसन्स निलंबनाचा प्रस्ताव आरटीओ कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यावर संबंधित विभाग योग्य तो निर्णय घेतो. प्रसंगी समजही दिली जाते; परंतु दारू अथवा अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयीन प्रक्रिया होते.
नागरिकांनी सुरक्षित आणि नियमातील वाहतूक करणे गरजेचे आहे. वेळोवेळी नियमांचे पालन केले पाहिजे. मद्यपान करून वाहन चालवू नये, नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येते. यामुळे नागरिकांनी दक्षता घेत वाहतूक करावी.
- अविनाश मोरे , पोलीस निरीक्षक.