पर्यायी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:09 IST2020-02-25T14:09:38+5:302020-02-25T14:09:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लांबोळा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. ...

पर्यायी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील लांबोळा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या पर्यायी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कापसाच्या गाठी वाहून नेणारा ट्रक उलटून अपघात झााला.
कोळदा ते खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने ठिकठिकाणी पर्यायी कच्चे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र या पर्यायी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे रुंदीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. प्रकाशापासून ते करजई गावापर्यंत तर रस्त्यावर ठिकठिकाणी चढ-उतार तयार झाले आहेत. या रस्त्यावरुन दुचाकी वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागते तर अवजड वाहन चालकांची काय अवस्था होत असेल. शिवाय पर्यायी रस्ते कच्चे असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने वाहनधारकांसह त्या त्या गावाच्या नागरिकांचा आरोग्यासाठी घातक ठरत आहे. धुळीमुळे दुपारच्या वेळेस तर समोरुन येणारे वाहनही दिसत नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहनधारकांना हा त्रास सहन करावा लागत असून दररोज लहान मोठे दोनपेक्षा जास्त अपघात या मार्गावर होत आहेत.
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अकोला येथून कापसाच्या गाठी भरुन जाणारा ट्रक (क्रमांक जे.जी.१० एक्स- ७४४९) लांबोळा गावाजवळील पर्यायी रस्त्यावरुन जात होते. या रस्त्यावरील खड्ड्यात ट्रक आदळल्याने तो उलटला. या अपघातात कुठलीही जिवीतहानी अगर गंभीर जखमी झाले नसले तरी ट्रकचे व कापसाच्या गाठींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूकही काही वेळ ठप्प झाल्याने इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने कोळदा ते खेतिया मार्गावर तीन वर्षापासून वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पर्यायी रस्ते योग्य नसल्याने अपघातही वाढले आहेत. तीन-चार किलोमीटरच्या अंतरावर जागोजागी अपूर्ण काम असल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळेही अपघात वाढले आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देण्याची मागणी त्रस्त वाहनधारकांकडून होत आहे.