तीन दिवसांपासून पावसाच्या विश्रांतीमुळे पेरण्यांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:31 IST2020-06-20T12:30:28+5:302020-06-20T12:31:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तीन दिवसांपूर्वी पडलेला पाऊस हा केवळ सातपुड्यातील ...

तीन दिवसांपासून पावसाच्या विश्रांतीमुळे पेरण्यांना वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तीन दिवसांपूर्वी पडलेला पाऊस हा केवळ सातपुड्यातील दुर्गम भागात झाला होता. त्यामुळे सुसरी व गोमाई नदीला पूर आला होता. पावसाने विश्रांती घेतल्याने पेरण्यांना वेग आला आहे. दरम्यान, गेल्या ४ दिवसांपासून कृषी सेवा केंद्र दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू राहत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी अडचणीचे ठरत होते.
नंदुरबार जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. त्यानंतर मान्सूनच्या सरी या आठवड्यात आल्या होत्या. जिल्ह्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता. पेरणीलायक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. आता मात्र तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचे वातावरण देखील तयार होत नसल्याची स्थिती आहे.
शनिवारी दुपारी तर कडकडीत ऊन देखील पडले होते. पावसाच्या उघडीपमुळे मात्र शेतकºयांनी पेरण्यांना वेग दिला आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात २० ते २५ टक्के खरीप क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. दोन ते तीन दिवसात ते प्रमाण ५० टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सद्य स्थितीत सर्वाधिक भर हा कापूस लागवडीवर असल्याचे चित्र आहे. त्याखालोखाल सोयाबीन आणि मकाचे क्षेत्र असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
पेरण्यांची लगबग सुरू असल्यामुळे बाजारात बियाणे खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी होत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे बियाण्यांची दुकाने गेल्या ४ दिवसांपासून सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येत होती. त्यामुळे चार दिवस शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
औषधी दुकानांप्रमाणेच बियाणे व खतांची दुकाने अर्थात कृषी सेवा केंद्र देखील दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी कृषी सेवा केंद्र चालकांनी केली होती. परंतु त्याला मान्यता देण्यात आली नव्हती. शनिवारपासून दिवसभर अर्थात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.