६८.२९ टक्के रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:32 IST2020-06-11T11:31:27+5:302020-06-11T11:32:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना दुप्पटीचा वेग फारसा नाही. मृत्यूदर देखील ७.३१ टक्केवर आहे. दुसरीकडे बरे होण्याचे ...

६८.२९ टक्के रुग्ण झाले बरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना दुप्पटीचा वेग फारसा नाही. मृत्यूदर देखील ७.३१ टक्केवर आहे. दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाण तब्बल ६८.२९ टक्के आहे. मध्यंतरी कोरोना रुग्ण वाढीचा वेग अतीशय मंद होता. आता नंतर तो वाढल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी ४१ पैकी पाच जण जिल्हाबाहेर बाधीत झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी नंदुरबारात आढळला होता. या रुग्णाच्या संपर्कातील इतर तीन जण देखील पॉझिटिव्ह आढळल्याने दुसऱ्याच दिवशी आकडा दुप्पटीवर गेला. त्यानंतर शहादा व अक्कलकुवा येथे रुग्ण आढळून आले.
सद्य स्थितीत तळोदा व धडगाव हे दोन तालुके कोरोनापासून लांब आहेत तर नवापूर तालुक्यात एकच रुग्ण आढळून आलेला आहे. सर्वाधिक रुग्ण नंदुरबार तालुक्यात, त्या खालोखाल शहादा तालुक्यात रुग्ण संख्या आहे.
असा आहे डेथ रेट
जिल्ह्यात कोरोनाचा डेथ रेट दहाच्या आत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ४१ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. डेथ रेटचा विचार करता तो ७.३१ पर्यंत आहे. अर्थात राज्याच्या डेथ रेटपेक्षा तो जास्त तर धुळे, जळगाव व नाशिक या उत्तर महाराष्टÑातील जिल्ह्यांपेक्षा कमीच आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये एक ७८ वर्षीय वृद्ध महिला. दुसरा हिंगणी येथील ५१ वर्षीय पुरुष तर तिसरा रुग्ण हा शहादा येथील ३२ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ४१ रुग्ण आढळले. त्यातील २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकुण रुग्णापैकी बरे झालेल्या रुग्णांचा रेट हा तब्बल ६८.२९ टक्के इतका आहे. तो लगतच्या जिल्ह्यापेक्षा अधीक असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोरोना कक्षात दाखल झालेले रुग्ण किमान १० ते १९ दिवसात बरे झाले आहेत. हा कालावधी देखील समाधानकारक असल्याचे सूत्रांनी सांगितले. बरे होणाऱ्यांमध्ये अगदी सहा वर्षांच्या चिमुकलीसह ६८ वर्षीय वृद्धाचा देखील समावेश आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
डबलींगचा रेट स्थिर
रुग्ण वाढण्याचे प्रमाण अर्थात दुप्पट होण्याचे प्रमाण स्थिर आहे. जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला. दुसºया दिवशी त्याच्याच संपर्कातील इतर तीनजण अर्थात डबलचा कालावधी अवघा एक दिवसाचा ठरला. २६ एप्रिलला ११ रुग्ण झाले. ३१ एप्रिलला १८, २९ मे ला ३२, ५ जूनला ३६ तर १० जूनला एकुण रुग्णांची संख्या ही ४१ झाली. सुरुवातीला डबलींचा कालावधी अतीशय कमी होता, नंतर तो वाढला.
लॉकडाऊन शिथीलतेमुळे
लॉकडाऊन शिथील केल्याने गेल्या काही दिवसात रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले. गेल्या १५ दिवसात रुग्णसंख्या १० ने वाढली आहे. यावरून त्याचा अंदाज येवू शकतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरतांना, बाजारात फिरतांना, गर्दीच्या ठिकाणी काळजी घेणे आवश्यक ठरते.
बाहेरून आलेले
जिल्ह्यात बाहेरून आलेले अर्थात मुंबई रिटर्न ९ जणांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात रजाळे येथील सहा, शिंदखेडा येथील एक, हिंगणी येथील एक तर नंदुरबार येथील एकाचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कातील दोन जण पॉझिटिव्ह आढळले.
जिल्हाबाहेर लागन
जिल्हाबाहेर लागन झालेल्या रुग्णांमध्ये सात जणांचा समावेश आहे. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसात आढळलेल्या रुग्णांपैकी तीनजणांना जिल्हाबाहेर लागन झालेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून जे रुग्ण आढळून येत आहे ते बाहेरगावी उपचारासाठी गेलेले रुग्ण आहेत. त्यांना तेथेच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जे रुग्ण बाहेरगावी उपचारासाठी जातील त्यांनी आधी जिल्हा रुग्णालयात स्वॅब देणे आवश्यक करावे अशी मागणी माडाचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी यांनी केली आहे. यामुळे असे रुग्ण नेमके कुठे कोरोनाग्रस्त होतात हे कळणार आहे. शिवाय प्रशासनाला उपचारासाठी देखील ते सोयीचे ठरणार आहे.