‘टीईटी’ला ५०८ परिक्षार्थी अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 02:48 PM2020-01-20T14:48:07+5:302020-01-20T14:48:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डीएड व बीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : डीएड व बीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेत आठ हजार पैकी ५०८ परिक्षार्थी अनुपस्थित होते. जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली.
दोन सत्रात परीक्षाथीर्नी ही परीक्षा दिली. सकाळच्या सत्रात १२ तर दुपार सत्रात ११ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर संबंधीत शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक यांना केंद्रसंचालक म्हणून नेमणूक देण्यात आली होती. तर शिक्षण विस्तार अधिकारी यांना प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे सहाय्यक परिरक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली होती. प्रत्येक चार परीक्षा केंद्रांसाठी गटशिक्षणाधिकारी दर्जाचे एक झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. भरारी पथकाअंतर्गत प्राचार्य डाएट, माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच निरंतर शिक्षणाधिकारी असे एकूण तीन भरारी पथक नेमण्यात आले होते.
या परीक्षेस सकाळ सत्रात पेपर क्रमांक एकला नोंदणीकृत पाच हजार ६३ पैकी ४,७८२ परीक्षार्थी उपस्थित होते तर २८१ परीक्षार्थी अनुपस्थित होते. तसेच दुपार सत्रात पेपर क्रमांक दोनला नोंदणीकृत ३,७३५ पैकी ३,५०८ परीक्षार्थी उपस्थित होते तर २२७ परीक्षार्थी अनुपस्थित होते.
परीक्षेचे संयोजन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे तसेच प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण यांनी केले.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या परिक्षांमधील गैरप्रकार लक्षात घेता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी विशेष काळजी घेतली होती.