नवापुरात 20 हजार कोंबड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:05 IST2021-02-03T13:05:48+5:302021-02-03T13:05:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील एका पोल्ट्री फार्मच्या २० ते २२ हजार कोंबड्या मेल्या असून, त्यांना खड्ड्यात पुरण्यात ...

नवापुरात 20 हजार कोंबड्यांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील एका पोल्ट्री फार्मच्या २० ते २२ हजार कोंबड्या मेल्या असून, त्यांना खड्ड्यात पुरण्यात आल्याची माहिती निनावी तक्रारीवरून मंगळवारी तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी संबंधित पोल्ट्री फार्मवर जावून पंचनामा केला.
कोंबड्या बर्ड फ्लूने की, राणीखेत आजाराने मेल्या हे प्रयोगशाळा अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. तोपर्यंत शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र यात नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे
एका पोल्ट्री फार्ममध्ये सहा ते सात शेड आहेत. प्रत्येक शेडमधील १०० ते सव्वाशे कोंबड्या व कोंबड्यांचे पिलू मृत्यूमुखी पडत आहेत, असे जवळजवळ दोन आठवड्यांपूर्वीपासून रोज ७०० ते ८०० कोंबड्या मृत्यूमुखी पडत आहेत. असे संबंधित कुक्कुटपालन व्यवसायिकांचे म्हणणे आहे. कोंबड्या मरत आहेत. मात्र बर्ड फ्लू या आजाराने मरत नाहीत असे पंचनामा करणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
मेलेल्या कोंबड्यांचा अहवाल आल्यावर निदान स्पष्ट होईल, असे सद्य परिस्थितीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. माात्र या बाबत अद्याप अहवाल आलेला नाही.
तालुक्यात बर्ड फ्लूचा धोका नाही. असे वृत्त १४ जानेवारीला प्रसिद्ध केले होते. २००६ मध्ये आलेल्या बर्ड फ्ल्यू कुक्कुटपालन व्यवसायिकांना खूप काही शिकवून गेला. गेल्या १४ वर्षांपासून आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसाय २००६ च्या तुलनेत फक्त ४० टक्केच सुरू आहे. सद्या १३ ते १४ पोल्ट्री फार्म कार्यरत आहेत. तालुक्यातील कुठल्याही पोल्ट्री फार्मवरील पक्षांना एच -पाच , एन- एकची लागण झालेली नाही. कुठलाही पक्षी या आजाराने बाधित नाही. तरीदेखील आम्ही पशुवैद्यकीय विभागाशी सतत संपर्कात राहून योग्य ती काळजी घेत आहोत, असे पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफभाई बलेसरिया यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले होते. बर्ड फ्ल्यूचे वृत्त समजताच येथील पोल्ट्री असोसिएशन व व्यवसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी या आजाराबाबत दुजोरा दिला नाही.
तालुक्यात १३ ते १४ कुकूटपालन व्यवसाय सुरू आहेत. २००६ मध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती. तेव्हापासून कुकूटपालन व्यवसायिकांनी कोंबड्यांना एच -पाच, एन -एक ची लागण होऊ नये यासाठीही खबरदारी घेतलेली आहे. त्यामुळे सद्य: परिस्थितीत कुठल्याही पक्षाला बर्ड फ्ल्यूची लागण झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र कुठेही पक्षांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला तर जिल्हा प्रशासनाला काळविण्याचे आदेश देण्यात आले होते. या बाबतीत नवापूर शहरातील कुक्कुटपालन व्यवसायिकांनी माहिती लपवली आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूची लागण २००६ मध्ये झाली होती. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सर्व पक्षी मारून बुजण्यात आले होते. त्यावेळेस तालुक्यातील ३० ते ३५ कुकूटपालन व्यवसाय ठप्प झाले होते. त्यावेळेस ३० ते ३५ कोटींचे नुकसान झाले होते.
नवापूर शहरालगतच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा अकस्मात मृत्यू होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मंडळ अधिकारी, नवापूर यांच्यामार्फत तपासणी केली असता सदरचे मृत्यू हे राणीखेत या आजारामुळे होत असल्याचे पोल्ट्री चालकाने सांगितले आहे. याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सर्व पोल्ट्री फार्मच्या तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे कळविले आहे. तरी नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- मंदार कुलकर्णी, तहसीलदार नवापूर
नवापूर तालुक्यात अद्यापही कोंबड्यांना लक्षणे दिसून येत नाहीत. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसून येत आहेत. याबाबत आमच्याकडे भोपाळचा अहवाल आहे. यात भारतातील कुठल्याही पोल्ट्रीतील कोंबडीला लागण झाल्याचे दिसून आलेले नाही. परंतु भीतीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. पशुसंवर्धन विभागातील तज्ञांशी संपर्क आहे.
- आरीफभाई बलेसरिया, अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशन, नवापूर