कोरोना काळातील सहिष्णूता खऱ्या अर्थाने लोकशाही मुल्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:13+5:302021-02-05T06:09:13+5:30
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री चव्हाण यांच्या ...

कोरोना काळातील सहिष्णूता खऱ्या अर्थाने लोकशाही मुल्यांचा गौरव
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. यावेळी महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आ. अमर राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, स्वातंत्र्यसैनिक, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
राज्यातील नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावे, यादृष्टीने आम्ही निर्णय घेतला असून, आता नांदेड ते जालनापर्यंतचा साधारणत: १९४ किमीचा स्वतंत्र समृद्धी मार्ग केला जाणार आहे. हा संपूर्ण मार्ग सिमेंट काँक्रिटचा सहा पदरी असून, यास अंदाजे ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च येईल. मार्गामुळे धर्माबाद येथून नांदेडपर्यंत अवघ्या १ तासात येणे शक्य होणार आहे. नांदेड येथून जोडल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत अडीच तासात नांदेड येथून औरंगाबादला पोहोचता येईल. मुंबईला जाण्याचा प्रवासही यामुळे अवघ्या सात तासात जलद आणि सुरक्षितरितीने नांदेडवासियांना करता येईल, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
धर्माबाद येथे रेल्वे उड्डाणपूल, भुयारी रेल्वेपूल अशा १७० कोटी रुपयांच्या कामांसह एशियन डेव्हलमेंट बँकेअंतर्गत नांदेड ते निळा - आसनापूल - मुगट - कारेगावफाटा ते बासर येथील ट्रीपल आयटीपर्यंत जवळपास १ हजार ३२५ कोटीचा रस्ता लवकरच हाती घेऊन याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.
कोरोनातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणखी काही काळ आपल्याला द्यावा लागणार आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी त्याचा धोका अजून टळलेला नाही, हे नागरिकांनी नीट लक्षात घेऊन काळजी घेतली पाहिजे. कोरोनाची लस जिल्ह्यातील गरजवंतांपर्यंत पोहोचावी, यादृष्टिने आरोग्य विभागातर्फे आपण नियोजन केले आहे. पहिल्या फेरीत आरोग्य विभागात व कोरोना व्यवस्थापन आणि नियंत्रण संदर्भात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देत आहोत. कोरोनावरची लस ही सक्षम असल्याने आपण सर्वांनी मोठ्या विश्वासाने लसीकरणासाठी तयार राहावे, असेही आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केले.