सातवी पासच्या अटीमुळे ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST2020-12-29T04:17:04+5:302020-12-29T04:17:04+5:30
अर्धापूर : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असून, गावागावांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

सातवी पासच्या अटीमुळे ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ
अर्धापूर : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असून, गावागावांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, ऐनवेळी सातवी पासची अट निवडणूक विभागाने लावल्यामुळे अनेकांची कोंडी होत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक आता रंगात आली आहे. गावागावात पॅनलचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी व उमेदवार निश्चित करण्याच्या कामात गाव पुढारी पॅनल प्रमुख गुंतले आहेत ठिकठिकाणी गुप्त बैठका, पॅनल निर्मिती, मतदारांच्या गाठीभेटी, भावकी, नातेवाईक यांच्या भेटी, चर्चा सुरू असून कोण सातवी पास आहे, याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
चांगले उमेदवार देऊन वाॅर्डात विजय कसा मिळवता येईल, या उद्देशाने उमेदवाराकडून प्रयत्न केले जात असतानाच निवडणूक आयोगाने सातवी पास असण्याची अट उमेदवारांना घातल्यामुळे निवडणुकीतील अनेकांची तारांबळ उडाली आहे. पॅनलच्या काही मातब्बर उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. हे उमेदवार म्हणजे जुनी प्रमुख नेतेमंडळी असून, त्यांच्या संपूर्ण गावावर प्रभाव आहे. मात्र, सातवी पास नसल्यामुळे त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यातून अनेक महत्त्वाच्या उमेदवारांचा पत्ता कट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.