- सुनील चौरे
हदगाव: तालुक्यातील वरवट येथे आई आणि दोन चिमुकल्या पुरात बुडून मरण पावल्याची घटना ताजी असतानाच, आज दुपारी गारगव्हाण येथे आणखी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गारगव्हाण शिवारातील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (२९ मे) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
निखील कुंडलिक वाढवे (वय १५, रा. गारगव्हाण) आणि संघर्ष बाळु पडघणे (वय १७, रा. नेवरी) अशी मृतांची नावे आहेत. संघर्ष आपल्या मामाच्या घरी गारगव्हाण येथे आलेला होता, गावात एका लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे तो काही दिवसासाठी येथे थांबला होता. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या संघर्षने ७० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने त्याच्या घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र दुर्दैवाने हा आनंद फार काळ टिकला नाही.
गारगव्हाण परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरुम आहे आणि त्यामुळे रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले गेले आहे. यामुळे तयार झालेल्या खदानी पावसाळ्यात पाण्याने भरून जातात. काल (२८ मे) अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे खदानी पूर्णपणे पाण्याने भरली होती. पाणी पाहून निखील आणि संघर्ष यांना पोहण्याचा मोह झाला. मात्र, खदानीतील पाण्याची खोली आणि धोका याचा अंदाज न आल्याने दुर्दैवाने दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरु केलं आणि दोघांना बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केलं.
या दुर्दैवी घटनेने गारगव्हाण आणि नेवरी या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अशा ठिकाणी पोहण्यापासून परावृत्त राहण्याचं आवाहन केलं असून, पावसाळ्यापूर्वी अशा खदानींची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणीही ग्रामस्थांतून होत आहे.