हदगावात सरपंचाच्या घरात थाटले सापाने बिऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:31 IST2018-07-04T18:29:43+5:302018-07-04T18:31:50+5:30
मनाठा येथील सरपंचाच्या घरी १५ साप निघाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते़ गावातील ग्रामस्थांनी पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती.

हदगावात सरपंचाच्या घरात थाटले सापाने बिऱ्हाड
हदगाव (नांदेड ) : मनाठा येथील सरपंचाच्या घरी १५ साप निघाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते़ गावातील ग्रामस्थांनी पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती.
सापाचे नाव काढले तरी अनेकांची बोबडी वळते़ परंतु आपल्या घरी एक किंवा दोन नाही तर चक्क १५ साप एकदाच निघाले तर काय होईल याची कल्पनाही मनात थरकाप उडविते़ नागीन सिनेमातल्या दृश्याप्रमाणे एकाच बिळातून तब्बल १३ साप (पिल्ले) बाहेर पडले़ सापाचा परिवारच तिथे राहत होता़
मनाठा येथील सरपंच दिक्षा नरवाडे यांच्या घरी दुपारी १२ च्या सुमारास नाग व नागीन जोडी निघाली़ त्यानंतर एकापाठोपाठ १३ पिल्ले चांगली हातभर लांबीची बिळातून बाहेर येत होती़ यामुळे सरपंच बाईच्या घरची मंडळी भांबरून गेली़ तर शेजारी पाजारी हे दृश्य पाहून चकीत झाले़. काही वेळातच बातमी पसरताच येथे बघ्यांची गर्दी वाढत गेली़ या दिवसामध्ये ग्रामीण भागात सापाचे दर्शन नेहमीच होते़ पण एवढ्या संख्येने मात्र नाही़ परिसरात प्राणीमित्र नसल्यामुळे या सापांना पकडण्याऐवजी जीवेच मारण्यात आले.