गरिबीमुळे आठवीतील शुभमची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:41 IST2018-03-19T00:41:38+5:302018-03-19T00:41:38+5:30
लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या शुभम बंडू भंगारे (वय १३) या मुलाने मागील आठवड्यात वडील व बहिणीच्या आजारावरील उपचार व शिक्षणाच्या विवंचनेतून स्वत:ची जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली़ गरिबी व लहान वयात मोठ्या संकटांचा सामना करण्याची वेळ शुभमवर आल्याने त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़

गरिबीमुळे आठवीतील शुभमची आत्महत्या
सुरेश जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
माळाकोळी : लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या शुभम बंडू भंगारे (वय १३) या मुलाने मागील आठवड्यात वडील व बहिणीच्या आजारावरील उपचार व शिक्षणाच्या विवंचनेतून स्वत:ची जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली़ गरिबी व लहान वयात मोठ्या संकटांचा सामना करण्याची वेळ शुभमवर आल्याने त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़
वडील बंडू भंगारे यांना शुभम, नयन व आरती ही तीन अपत्ये़ शुभमच्या आईचा मृत्यू दहा वर्षांपूर्वीच पाण्यात बुडून झाला़ दरम्यान, मोठी बहीण आरती (वय १५ ) हिला रक्ताच्या कॅन्सरने गाठले़ तर वडिलांना अर्धांगवायूचा आजार जडला़ दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या वडिलांच्या उपचार व बहिणीच्या आजाराची चिंता लहान वयातच शुभमला सतावत होती. घरात वयोवृद्ध आजी अंजनाबाई व शुभम या दोघांवरच कुटुंबाची जबाबदारी पडली़ घरात कोणीही कमावता व्यक्ती नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली़ अशा परिस्थितीत शुभम आठवीपर्यंत शिकला़ ४ मार्च रोजी शुभम आजी सोबत पाच रूपये किलोप्रमाणे चिंचा फोडण्यासाठी कामावर गेला होता़ दुपारी जेवण करून येतो म्हणून घरी गेलेल्या शुभमने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली़ वर्गात अत्यंत हुशार असलेल्या शुभमने गरिबीला कंटाळून आणि वडील, बहिणीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने नैराशातून आत्महत्या केल्याचे समोर आले़ आजीच्या ओढाताणीमुळे शुभम, नयन व बहीण आरती या भावंडांना कधीही अंगभर कपडे मिळाले नाहीत. शिक्षणासाठी वह्या मिळाल्या नाहीत.़ या सर्वांचा परिणाम शुभमच्या बालमनावर होत होता. तो नेहमी आजीला म्हणायचा, आजी ही वेळ आपल्यावरच का आली असावी? बाबांचा आजार, आमचे सर्वांचा खर्च हे सर्व तू कसे करणार? यात घरात खाण्यासाठी धान्य नाही, रोजगारही मिळत नाही. शुभमचा लहान भाऊ नयन सहाव्या व बहीण आरती नवव्या वर्गात असून त्यांचे शिक्षण व इतर खर्चाच्या ओझ्याखाली आजी अंजनाबाई पुरत्या खचल्या आहेत. दरम्यान, भाजपाचे अनु़ जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मारोती वाडेकर तसेच इतर दानशूरांनी भंगारे कुटुंबास मदतीचा हात पुढे केला आहे़