६० वर्षांनंतर पहिल्यांदाच रस्ता जातोय पूर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST2020-12-29T04:17:21+5:302020-12-29T04:17:21+5:30
कासराळी : स्वातंत्र्यप्राप्तीपासून रस्ताच पाहिला नसलेल्या रामपूर मजरा या दोनशे लोकसंख्या वस्तीच्या गावाला ग्रामस्थांच्या अथक परिश्रम व पाठपुराव्याने ...

६० वर्षांनंतर पहिल्यांदाच रस्ता जातोय पूर्णत्वास
कासराळी : स्वातंत्र्यप्राप्तीपासून रस्ताच पाहिला नसलेल्या रामपूर मजरा या दोनशे लोकसंख्या वस्तीच्या गावाला ग्रामस्थांच्या अथक परिश्रम व पाठपुराव्याने झालेल्या रस्ता मंजुरीने प्रगतिपथावर असलेल्या कामाने ग्रामस्थ समाधानी झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रामपूर मजरा या गावाचा रस्ता रेंगाळला होता. अवघ्या दोनशे लोकवस्तीच्या रामपुरातील लोकांना ये-जा करण्यासाठी हक्काचा रस्ता नव्हता. माळरानाच्या वाटेची येथे वहिवाट होती. मात्र, कालांतराने स्थानिक राजकारण आडवे आले आणि वहिवाटीचा मार्ग बंद झाला. पाच वर्षांपूर्वी हक्काचा रस्ता झालाच पाहिजे, असा इरादा केलेल्या रामपुरातील लोकांनी तत्कालीन आ. सुभाष साबणे यांना रस्त्याच्या निधीसाठी मागणी केली. खाजगी शेतकऱ्यांच्या शेताच्या कडेने रस्त्याचा मार्ग निश्चित झाला. शेतकरीही स्वयंस्फूर्त रस्त्यासाठी शेतातून रस्त्यासाठी जागा दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी येथे रस्त्याला मंजुरी मिळाली. रस्त्याचे कामही सुरू झाले. मात्र, मंजूर झालेल्या आमदार निधीत रस्ता अपुरा झाला. जितका निधी मंजूर झाला तेवढेच काम झाले. राज्य मार्ग ते गावालगत एक की.मी. अंतर दूर इतके काम झाले. जवळपास १ कि.मी.चा रस्ता होणे बाकी होते. मात्र, उर्वरित ते ही काम आता पूर्णत्वास जात आहे. या रस्त्याचे काम ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन उत्तम काम होत आहे. रामपूरचेच रहिवासी असलेले बांधकाम अभियंता धोंडिबा कपाळे यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून रस्ताच नसलेल्या रामपुरात आता हक्काचा रस्ता झाला असून ‘लोकमत’नेही या दुर्लक्षित रस्त्यासाठी आवाज उठविला होता.
कोट
रामपूरवासीयांच्या भावना लक्षात घेऊन उत्तमरीत्या काम चालू आहे. यामुळे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांची गैरसोय टळली व वेळेची बचत झाली आहे.
-धोंडिबा पा. कपाळे, ग्रामस्थ तथा तालुका सरचिटणीस काँग्रेस कमिटी, बिलोली.