राक्षसी क्रौर्यामुळे नांदेडमध्येही वंचितांच्या वस्त्या भेदरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:31 AM2018-07-03T00:31:00+5:302018-07-03T00:36:42+5:30

लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवेनंतर धुळे जिल्ह्यात पाच जणांना ठेचून मारल्याच्या राक्षसी क्रौर्याचा धसका पोटापाण्यासाठी धडपडणाऱ्या वंचितांनी घेतल्याचे चित्र आहे. सोमवारी उमरी नजीकच्या अशाच एका वस्तीला भेट दिली असता धुळे जिल्ह्यातील ‘त्या’ घटनेमुळे दोन घासासाठी संघर्ष करणाºया या पाड्यातील कुटुंब भेदरल्याचे दिसून आले.

Due to demonic cruelty, the habitations of the wellbeing in Nanded also remained intolerable | राक्षसी क्रौर्यामुळे नांदेडमध्येही वंचितांच्या वस्त्या भेदरल्या

राक्षसी क्रौर्यामुळे नांदेडमध्येही वंचितांच्या वस्त्या भेदरल्या

Next
ठळक मुद्देअफवांची दहशत : अंगमेहनतीच्या कामावरच चालते भटक्यांची उपजीविका

बी.व्ही. चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी : लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवेनंतर धुळे जिल्ह्यात पाच जणांना ठेचून मारल्याच्या राक्षसी क्रौर्याचा धसका पोटापाण्यासाठी धडपडणाऱ्या वंचितांनी घेतल्याचे चित्र आहे. सोमवारी उमरी नजीकच्या अशाच एका वस्तीला भेट दिली असता धुळे जिल्ह्यातील ‘त्या’ घटनेमुळे दोन घासासाठी संघर्ष करणाºया या पाड्यातील कुटुंब भेदरल्याचे दिसून आले.
मागील काही दिवसांपासून लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा अनेक ठिकाणी पसरत आहेत. या अफवेने रविवारी धुळे जिल्ह्यातील पाच जणांचा बळी घेतला. या घटनेमुळे वाड्या-वस्त्यावर राहुट्या करुन राहणाºया आणि रोजीरोटीसाठी संघर्ष करणाºया भटक्या समाजातील नागरिकांत प्रचंड दहशत पसरली आहे. उमरी शहराला लागूनच ३० ते ४० जण मागील २५ वर्षांपासून राहुट्या करुन राहत आहेत. यातील काही जण नंदीवाले, काही पारधी, काही वैदू तर काही भैरव या भटक्या समाजातील आहेत. उमरीपासून हाकेच्या अंतरावर ही वस्ती असली तरी शासकीय योजना अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. या सर्व कुटुंबियांचा उदरनिर्वाह केवळ अंगमेहनतीच्या कौशल्यावर चालू आहे. २५ वर्षांपासून ही कुटुंब उमरीनजीक वास्तव्यास असली तरी त्यांंना कसलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.
केवळ राहण्यासाठी मोकळी जागा आहे. पाण्याची सोय आहे. गावात कुणाचाच काही त्रास नाही. त्यामुळे नजीकच्या मुदखेड येथून नंदीवाले समाज येथे आला. या समाजाची येथे १५ घरे आहेत. मूळ अर्धापूरचे रहिवासी असलेले वैदू समाजातील ५ कुटुंब उमरीला येऊन स्थिरावली. मोघाळी येथून पारधी समाजाची दोन कुटुंब येथे येऊन स्थायिक झाली. उर्वरित जोशी, भैरव अशी कुटुंब येथे वास्तव्यास आली. गावाबाहेरच तंबू ठोकून त्यांनी ही तात्पुरती वस्ती उभारली आहे. एखादी वसाहत झाली की, त्या गावात चोºया, हाणामारी आदी प्रकारांत वाढ होते. पोलिसांकडे तशी नोंद होताच अशा लोकांना हुसकावण्याची मोहीम सुरू होते. उमरी शहरातील ही वस्ती मात्र यास अपवाद आहे. सर्व लोक सकाळपासून अंधार पडेपर्यंत काही ना काही अंगमेहनतीचे काम करुन पोट भरतात. मजुरी करणे, डब्बे, चाळणी तयार करुन खेड्यात फिरुन विकणे, महिला- पुरुषांना मदत करीतच फुगे, कानातले फूल, नथ, पोत, काळे मणी आदी वस्तू विकून पैसा कमवितात. कुटुंबातील प्रत्येकजण काही ना काही काम करुन पोटाचा प्रश्न सोडविण्यात मग्न असतो. आता काही महिला गाय, म्हैस, शेळ्या पाळत आहेत. तर काही तरुण मुले वाजंत्री वाजविण्यात पारंगत झाले. त्यामुळे लग्नसराईच्या काळात चार पैसे मिळतात. त्यातून बायका-मुलांचे पालनपोषण होते. या कुटुंबातील काही मोजकी लहान मुले शाळेत जातात. दहावीपर्यंत कुणीच आजवर गेला नाही. सहावी-आठवीपर्यंत शिकून बरीच मुले शाळा सोडून आईवडिलांसोबत कामे करतात. काही तरुण गावात हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी कामे करतात.
---
वस्त्यावर योजनांचा थांगपत्ता नाही, शिक्षणासाठीही चिमुकल्यांची परवड
नंदीवाले समाजातील गंगाधर नकलवाड (वय ५०) यांनी सांगितले, गेल्या २० वर्षांपासून आम्ही मुदखेडहून उमरीला आलो. ३ पैकी फक्त एका मुलीचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. मी मजुरी करतो. तर पत्नी प्लास्टिकच्या किरकोळ वस्तूृ, डब्बे, चाळणी आदी विकून पोटापाण्याची गरज भागवतो. तिन्ही मुलींची लग्ने झाली. २० वर्षांपासून उमरीला वास्तव्य असले तरी येथे मतदार यादीत नाव नाही, रेशनकार्ड नाही. तहसीलचे लोक आले, तुमची फाईल वरुन येणार आहे, असे सांगितले. अद्याप आम्हाला येथे कोणत्याच सरकारी योजनेचा फायदा नसल्याचे गंगाधर नकलवाड यांनी सांगितले. गबर यलप्पा जिंकलवाड (वय ३५) नंदीवाले यास ५ अपत्य आहेत. पैकी केवळ एकच मुलगा तिसºया वर्गात गावाजवळ आश्रमशाळेला आहे. इतर ३ मुली व १ मुलगा अशिक्षित आहेत. १८ वर्षांची अविवाहित गंगासागर ही आईसोबत काटे, फुगे, काळे मणी, पोत, डबे, चाळणी आदी साहित्यांची खेड्यातून फिरुन विक्री करते.
---
अफवा पसरविल्यास आता होणार कारवाई
मुळे पळविणाºया टोळीची अफवा पसरविणाºयांवर कारवाईसाठी आता जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यानुसार मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आणि पोलीस पाटील यांना आदेशित करण्यात आले आहे़ अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे़ मागील काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यभरात लहान मुले पळविणारी टोळी असल्याची अफवा सोशल मीडियावरुन पसरविण्यात येत आहे़

Web Title: Due to demonic cruelty, the habitations of the wellbeing in Nanded also remained intolerable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.