५०० प्रमाणपत्र वाटप अडगळीला
By Admin | Updated: August 6, 2014 02:16 IST2014-08-05T23:55:27+5:302014-08-06T02:16:30+5:30
कंधार : महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

५०० प्रमाणपत्र वाटप अडगळीला
कंधार : महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जात प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्र काढण्यासाठीची प्रक्रिया ऐन भरात आली आहे. परंतु संपामुळे जवळपास ५०० संचिका अडगळीला पडल्याची बाब समोर आली आहे. यात सर्वाधिक फटका मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रवेश, शिष्यवृत्तीसाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी अशाच प्रमाणपत्राची आवश्यकता लागते. शासकीय व निमशासकीय सेवेत नोकरीसाठी जातवैधता, रहिवासी पुरावा महत्वपूर्ण मानला जातो. त्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची आवश्यक प्रमाणपत्रासाठी भक्कम पुरावे जमा करण्यासाठी मोठी घाई चालू आहे. त्यातच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे पुरावे जमा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. त्यातच ‘क’ पत्रक उपलब्ध नसलेली उमरज, शेकापूर, फुलवळ, पेठवडज, पानभोसी, शिराढोण, पानशेवटी, कल्हाळी ८ गावे समोर आली. ‘क’ पत्रक, खासरा ही महसुली पुरावे असल्यास इतर पुरावे त्याला बळकटी देतात.
‘क’ पत्रक नसल्यामुळे निर्गम उताऱ्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. जि.प. शाळात पालकांची वर्दळ सुरू झाली. आवश्यक पुरावे जमा करुन पालक-विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र संचिका सादर केल्या. मराठा समाजाच्या जवळपास ४०० पेक्षा जास्त संचिका दाखल करण्यात आल्या आहेत. इतर प्रवर्गातील पालक- विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, मिळकतीचे प्रमाणपत्र आदी संचिका दाखल झाल्या आहेत. परंतु गत चार दिवसापासून महसूल कर्मचारी संघटनेचे डी.पी. झगडे, एस.बी. गिते आदीच्या नेतृत्वाखाली कर्मचारी संपावर गेल्याने प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सादर केलेल्या संचिका आता अडगळीला पडल्या. नवीन संचिकाचा ओघ मोठा आहे. परंतु संपामुळे त्या संचिकाचा प्रवास सुद्धा अर्धवट झाला. सेतू सुविधाावरुन संचिका आता हलत नाहीत. त्यामुळे अनेकजण खेटे घालत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. राज्य शासनाने मराठा मुस्लिम समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतला. आता प्रमाणपत्रासाठी संपाचा मोठा अडसर ठरत आहे. शासनाने तत्काळ संप मिटवावा आणि गैरसोय दूर करण्याची मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)