चोहोबाजूने बळीराजाच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST2020-12-31T04:18:26+5:302020-12-31T04:18:26+5:30

नांदेड जिल्ह्यात खरीप ७ लाख ४२ हजार आणि रब्बीचे १.७६ लाख असे मिळून जवळपास सव्वा नऊ लाख हेक्टर क्षेत्र ...

Disappointment on the part of Baliraja | चोहोबाजूने बळीराजाच्या पदरी निराशाच

चोहोबाजूने बळीराजाच्या पदरी निराशाच

नांदेड जिल्ह्यात खरीप ७ लाख ४२ हजार आणि रब्बीचे १.७६ लाख असे मिळून जवळपास सव्वा नऊ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यंदाच्या वर्षात पर्जन्यमान चांगले झाल्याने जवळपास सर्वच लघु, मध्यम व मोठे प्रकल्प तुडुंब भरले होते. परिणामी रब्बीला आवश्यक तेवढ्या पाणी पाळ्या मिळणार या उद्देशाने शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी केली. परंतु खरिपामधील पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यामध्ये कपाशीसह सोयाबीन, उडीद आणि इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जवळपास सातशे गावांना बसला. त्यापैकी ६८५ गावे बाधित होऊन एक लाख ५९ हजार २८९ हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन काढणीला आलेल्या काळात अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटले. त्यामुळे सोयाबीन शेताबाहेर काढणेही कठीण झाले तसेच कपाशीला देखील फटका बसला. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक काढून हरभरा, उन्हाळी ज्वारी आणि गहू घेण्याचा विचार करून त्या पद्धतीचे नियोजनही केले. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे यांना रब्बीतील पिकांनाही फटका बसत आहे. तुरीच्या उत्पादनात विक्रमी घट झाली असून बहुतांश शेतकऱ्यांच्या तुरी उधळल्याने कापून जनावरांना चारा म्हणून टाकली.

बोगस बियाणे प्रकरण थंड बस्त्यात

नांदेड जिल्ह्यापासून सुरु झालेल्या बोगस बियाण्यांच्या तक्रारी सबंध मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात दाखल झाल्या. परंतु प्रशासनाकडून अद्यापही बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांवर, व्यापाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. नांदेड जिल्ह्यात जवळपास २३ हजार ५७९ शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत केवळ चारशे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार आणि प्रशासन करीत आहे. बोगस बियाणे प्रकरणात दाखल असलेल्या १७७ गुन्ह्यांमध्ये पुढे काहीही झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सदर प्रकरणी आयुक्तालय स्तरावर सुनावणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

पेरणी काळात खताचा तुटवडा

वर्षभराच्या कालावधीत शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा सामना करावा लागला. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली, या पेरणी काळात खताचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि पुन्हा ऐन पीक काढणी काळात अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातही अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ आणि दिरंगाई झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले.

लॉकडाऊन काळात मोठे नुकसान

लॉकडाऊन काळामध्ये पोलिसांच्या भीतीने शेतकऱ्यांना आपला माल शहरांमध्ये नेता आला नाही आणि आता अतिवृष्टीमुळे शेतात पिकलेला माल शेतातच सडत आहे. त्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी निराशा देणारे ठरले आहे. भाजीपाला लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज जनावरांना टाकले तर कापूस, तूर अशा उभ्या पिकात जनावरे सोडली. त्यात सध्या केळीला भाव नसल्याने शेतकरी केळीच्या बागा कापून काढत आहेत.

Web Title: Disappointment on the part of Baliraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.