२०२० मध्ये शेतकऱ्यांसाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:53+5:302020-12-29T04:16:53+5:30
पार्डी : अर्धापूर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत समजली जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली आणि कोरोनाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि बोगस ...

२०२० मध्ये शेतकऱ्यांसाठी धोकादायक
पार्डी : अर्धापूर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत समजली जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली आणि कोरोनाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि बोगस बियाणे शिरकाव केला. यामुळे कृषी अर्थव्यवस्था पार कोलमडली त्यात भरीस भर गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले यामध्ये शेतकऱ्याचे हिरवे स्वप्न उध्वस्त झाले.
अर्धापूर तालुक्यात निसर्गप्रकोप आणि मानवनिर्मित संकटामुळे सरत्या वर्षात निसर्ग प्रकोपासह बोगस बियांनामुळे शेतकऱ्याची वाट लागली या परिस्थितीतून सावरण्यासाठी रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे याही पिकांवर परिणाम झालेला दिसत आहे. सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी सोयाबीन काढणीचे कामही पडले नाही. सोयाबीन पेरणीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. सोयाबीन पेरले पोत्याने आणि घरी आणले मुठीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
मानवनिर्मित संकटाने हाहाकार अर्धापुर तालुक्याची अर्थव्यवस्था मोडून काढली आहे. अर्धापूर शहरातून दररोज कोटीच्या जवळपास आर्थिक व्यवहार होत असतो. मात्र कोरोनामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाली होती. तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था केळीच्या पिकावर अवलंबून आहे. येथील केळी देशासह परदेशात निर्यात केली जाते. केळीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध आहे. लाखो मजुरदार केळीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. मजुरदाराचे उपजीविकेचे साधन केळीच पीक आहे आणि अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रमुख पीक केळी आहे. मात्र केळी काढणीच्या वेळीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्याने आणि देशात लॉकडाऊन करावे लागले यामुळे संपूर्ण दळणवळण व्यवस्था ठप्प झाली. केळीची निर्यात थांबल्याने केळीला कवडीमोल दर मिळाला अनेक शेतकऱ्याची केळी बनात राहिली केळीची नासाडी झाली होती.
अनेक शहरे लॉकडाऊन झाल्याने केळीला कवडीमोल दर मिळाला होता. लाखो रुपये खर्च करून केळी उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात काही पडले नाही. केळीसाठी लाखो रुपये खर्च केला. मात्र तोही निघाला नाही यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस बरोबर तुरीच्या उत्पादनही घटले आहे. यातून उभारण्यासाठी रब्बी हंगामाची तयारी केली मात्र सततचे ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवरही परिणाम झाला आहे. रब्बीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकंदरीत २०२० वर्ष शेतकऱ्यांसाठी लाभदायक राहिला नाही.