सोयाबीन बियाण्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST2021-05-26T04:19:01+5:302021-05-26T04:19:01+5:30
नांदेड : गतवर्षी सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर जिल्ह्यात जवळपास १८ कंपन्यांवर ...

सोयाबीन बियाण्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
नांदेड : गतवर्षी सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर जिल्ह्यात जवळपास १८ कंपन्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले हाेते. त्यामुळे यंदा सोयाबीन बियाणे खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून, बियाणांची उगवण क्षमता तपासूनच बियाणांची विक्री करावी, असे आवाहन संघटनेने केले आहे. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गतवर्षी बाजारात अनेक कंपन्यांसह व्यापाऱ्यांनी बियाणांची वाढती मागणी लक्षात घेऊन बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे काम केले. त्यातून लाखो शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नसल्याने दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यात केवळ ‘महाबीज’कडून नुकसानभरपाई म्हणून बियाणांची किमतीची रक्कम शेतकऱ्यांना परत करण्यात आली; परंतु इतर कंपन्यांनी हात वर करत न्यायालयात विवाद करणे सोयीचे मानले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. परिणामी यंदा महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स सीड्स डिलर्स असोसिएशनच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांना पत्र पाठवून आवाहन केले आहे. सर्व व्यापाऱ्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासूनच बियाणांची विक्री करावी, असे पत्रात नमूद केले आहे.
विक्रेत्यांनी ही घ्यावी काळजी
सोयाबीन बियाणांच्या प्रत्येक लॉटमधील बियाणांमधून १०० ते १५० बिया घेऊन उगवणक्षमतेची विहीत पद्धतीने पडताळणी करावी तसेच ज्या लॉटमध्ये बियाणांची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल अशा लॉटमधील बियाणे शेतकऱ्यांना विक्री करू नये. ज्या बियाणांची क्षमता ७० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तेच बियाणे विक्री करावे.
शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे
उगवणक्षमता तपासणी केलेले बियाणेच खरेदी करावे, सोयाबीन बियाणांचे बाह्य कवच नाजूक असल्याने सदर बियाणांची धूळ पेरणी करू नये, बियाणे नाजूक असल्याने बियाणांच्या पिशव्यांची वाहतूक करताना तसेच साठवणूक करताना विशेष खबरदारी घ्यावी तसेच बियाणे खरेदी करताना बिलावरील बियाणे कंपनीचे नाव, लॉट नंबर बॅगवरील तपासणी करून घ्यावे, सोयाबीनची पेरणी साधारण १०० ते १२५ मि.मी. पाऊस झाल्यानंतरच करावी.