संवाद हरविलेल्या जगात नागपूरच्या तरुणांचा असाही अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:14 IST2018-01-09T20:12:08+5:302018-01-09T20:14:57+5:30
समाजाच्या एकोप्याचा सर्वात महत्त्वाचा कणा म्हणजे संवाद, हा संवादच आज मोबाईलमुळे हरविलेला आहे. तंत्रज्ञानामुळे संवादाची पडलेली दुफळी भरून काढण्यासाठी काही तरुणांनी एक अभिनव उपक्रम शंकरनगरातील उद्यानामध्ये राबविला होता. यात सहभागी झालेल्या अनोळखींनी डोळ्यावर पट्टी बांधून मनसोक्त गप्पा ठोकल्या.

संवाद हरविलेल्या जगात नागपूरच्या तरुणांचा असाही अभिनव उपक्रम
अंकिता देशकर
आॅनलाईन लोकमत
नागपूर : संवादाची माध्यमे आता काळानुरूप बदलली आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ केले तरी, आपुलकी मात्र दुरावली आहे. तंत्रज्ञानाचे कुतूहल आज वाटत असले तरी, भविष्यात त्याचे परिणामही भोगावे लागणार आहे. मुळात समाजाच्या एकोप्याचा सर्वात महत्त्वाचा कणा म्हणजे संवाद, हा संवादच आज मोबाईलमुळे हरविलेला आहे. तंत्रज्ञानामुळे संवादाची पडलेली दुफळी भरून काढण्यासाठी काही तरुणांनी एक अभिनव उपक्रम शंकरनगरातील उद्यानामध्ये राबविला होता. यात सहभागी झालेल्या अनोळखींनी डोळ्यावर पट्टी बांधून मनसोक्त गप्पा ठोकल्या.
आजच्या युगात आपल्याला हातातील मोबाईलपासून क्वचितच वेळ मिळतो. मोबाईलवर तासन्तास बोलणारे आपण, मुळात एकमेकांच्या समोर आलोत तर दातओठ खातो. या आणि अशाच अनेक गोष्टी लक्षात घेत नागपूरमधील काही तरुण एकत्र आलेत आणि गुडविल ट्राईब या नावाखाली एक अनोखा उपक्र म वर्षाच्या पहिल्या रविवारी, शंकरनगरच्या उद्यानामध्ये घेतला. उद्यानाच्या दारावरच सहभागी झालेल्या लोकांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यात आली. त्यांना त्यांच्या अनोळखी सहयोगीजवळ नेऊन बसविण्यात आले. यात एक अट होती, अर्ध्या तासाचे हे संभाषण संपेपर्यंत एकमेकांना आपले नाव सांगायचे नाही आणि मनसोक्त गप्पा मारायच्या.
या कार्यक्र माकरिता फेसबुकच्या माध्यमातून आॅनलाईन प्रवेशप्रक्रि या घेण्यात आली. अशा पहिल्या-वाहिल्या उपक्र माला खूप गर्दी नको म्हणून विविध वयोगटातील फक्त ६० लोक निवडण्यात आले. डोळ्यावर पट्टी असूनदेखील सहभागी झालेल्यांनी गप्पा मारल्या आणि शेवटी गर्दीमध्ये आपण कोणासोबत बोललो असावे याचादेखील विचार केला.
शेवटी प्रत्येकाला एक त्याच्या सहयोग्याचा पत्ता असलेले पोस्टकार्ड देण्यात आले. आपण ज्यांच्यासोबत बोललो त्याला न पाहता, त्याच्याबद्दल काय वाटले हे त्या पोस्टकार्डवर लिहायला सांगितले. या कार्यक्र माचे वैशिष्ट्य म्हणजे गप्पा मारताना संपूर्ण वेळ कुणीही आपल्या खिशातील मोबाईल काढले नाही.