नागपुरात का तुटेना कोरोनाची साखळी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 09:04 PM2021-04-30T21:04:34+5:302021-04-30T21:07:03+5:30

corona chain मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. मनपा प्रशासनाचे दावे व प्रत्यक्षातील स्थिती यात मोठी तफावत आहे. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतदेखील याच बाबी समोर आल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे करण्यात येत असलेले दुर्लक्ष, मर्यादित आरोग्यसुविधा आणि अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव ही तर कोरोनावाढीची कारणे आहेतच. नागपुरात कोरोनाची साखळी नेमकी का तुटत नाही यावर टाकलेला हा प्रकाश.

Why the broken corona chain in Nagpur? | नागपुरात का तुटेना कोरोनाची साखळी ?

नागपुरात का तुटेना कोरोनाची साखळी ?

Next
ठळक मुद्देकोविड प्रोटोकॉलच्या नावाखाली औपचारिकता : वैद्यकीय सुविधांचा अभाव, शासन-मनपा-रुग्णालयांत समन्वयच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. मनपा प्रशासनाचे दावे व प्रत्यक्षातील स्थिती यात मोठी तफावत आहे. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतदेखील याच बाबी समोर आल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे करण्यात येत असलेले दुर्लक्ष, मर्यादित आरोग्यसुविधा आणि अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव ही तर कोरोनावाढीची कारणे आहेतच. नागपुरात कोरोनाची साखळी नेमकी का तुटत नाही यावर टाकलेला हा प्रकाश.

ना ट्रेसिंग, ना त्वरित उपचार

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मनपा प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही. कोविड प्रोटोकॉलचे पालन योग्य पद्धतीने झालेच नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि उपचार यावर भर दिला गेला नाही. मुंबईत बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची त्वरित चाचणी होते. नागपुरात मात्र यात हलगर्जीपणा दाखविण्यात आला व त्यामुळे कोरोनाची साखळी आणखी वाढत गेली.

ऑक्टोबर महिन्यापर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत होते. मात्र त्यानंतर त्याला ब्रेक लागला. फेब्रुवारी महिन्यात बाधितांची संख्या परत वाढायला लागल्यानंतर प्रत्येक रुग्णामागे कमीत कमी १० ते १५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायला हवे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचा सांगणे होते. प्रत्यक्षात मनपाने त्याकडे दुर्लक्ष केले. अनेक बाधितांना तर ते ठीक झाल्यानंतर मनपाकडून माहिती विचारण्यासाठी फोन आले. होम आयोसेलेशनमध्ये असलेल्यांवर उपचार कसे सुरू आहेत यासाठी विचारणा करण्यासाठी मनपाकडे आवश्यक यंत्रणा नाही. दररोज सरासरी साडेसहा हजार रुग्ण निघत असताना त्यापैकी १० टक्के रुग्णांशीदेखील संपर्क होत नाही.

वर्षभरानंतर सुविधांची व्यवस्था नाही

योग्य वेळेत बेड न मिळणे, उपचारादरम्यान औषधे व ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर्स व इतर बाबींसाठी करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. नागपूरला मध्य भारतातील वैद्यकीय हब म्हटले जाते. मात्र मनपाच्या रुग्णालयांत मर्यादित व्यवस्था आहे. एकूण रुग्णांपैकी किती जणांना ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्सची गरज पडू शकते याचा अभ्यासच झाला नाही. परिणामी वर्षभरानंतरदेखील आवश्यक सुविधा निर्माण होऊ शकल्या नाहीत. वर्षभराचा कालावधी मिळूनदेखील मनपाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये पाचशेहून अधिक बेड नाहीत. मेडिकल व मेयो इस्पितळांवर मोठा भार येत आहे. तेथे छत्तीसगड, मध्य प्रदेशसह विदर्भातील इतर जिल्ह्यांतील रुग्णदेखील येत आहेत. त्यामुळे बेड मिळणे कठीण झाले आहे. खासगी रुग्णालयात अगोदर पैशांची मागणी केली जाते. गोल्डन पिरेडमध्ये उपचार मिळत नसल्याने मृत्यू पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. नागपूर शहरात दररोज चार हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र उपलब्ध बेड्सची संख्या ७,८५९ इतकीच आहे. व्हेंटिलेटर्सची सुविधा असलेले बेड्स केवळ ५६० इतके आहेत, तर ४ हजार ७९४ ऑक्सिजन बेड्स आहेत.

मर्यादित मनुष्यबळ, लोकप्रतिनिधींची उदासीनता

रुग्णांची सातत्याने संपर्क ठेवणे आवश्यक असताना मनपाकडून मर्यादित मनुष्यबळाचे कारण देण्यात येत आहे. वैद्यकीय भाग वगळता इतर प्रशासकीय कामांसाठीदेखील लोक उपलब्ध नाहीत. इतर विभागांतील लोक कोरोनासाठी काम करण्यास तयार नाही. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीदेखील उदासीनता दाखविली.

तंत्रज्ञानाच्या वापराकडे दुर्लक्ष

बृहन्मुंबई महानगरपालिकेने रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी विशेष व्यवस्था उभारली. नागपूर मनपाने कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केली. मात्र बरेचदा या हेल्पलािनवर काहीच प्रतिसाद मिळत नाही. शिवाय येथे रुग्णांना योग्य पद्धतीने मार्गदर्शनदेखील होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

समन्वयाचा अभाव

नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे. मात्र येथे मनपा प्रशासन, रुग्णालय, राज्य शासन यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. मनपा प्रशासनाच्या कारभारावर तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेदेखील ताशेरे ओढले आहेत. एप्रिल महिन्यात ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेकांचा मृत्यू झाला. स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वपक्षीय समन्वय बैठकांना सुरुवात झाली. मनपा व रुग्णालयांमध्ये समन्वय नसल्याने रुग्णांना फटका बसतो आहे. मनपाने शहरातील कुठल्या रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी किती बेड आहेत हे कळावे यासाठी विशेष संकेतस्थळ सुरू केले. मात्र या संकेतस्थळावरील माहिती व प्रत्यक्षात उपलब्ध असलेले बेड याचा ताळमेळच बसत नाही. संकेतस्थळावर बेड असल्याचे दाखविले जाते व रुग्णालयांत मात्र त्यांची उपलब्धता नसते. यामुळे नाहक रुग्णांची पायपीट होते व वेळेत उपचार मिळू शकत नाही.

एप्रिल महिन्यातील आकडेवारी (नागपूर जिल्हा)

पॉझिटिव्ह - १,७८,१२१

मृत्यू - २,२३०

कोरोनामुक्त - १,३९,१५६

नागपूर शहरातील बेडची स्थिती

बेड्स - संख्या

सर्वसाधारण बेड्स – ३१९

ऑक्सिजन बेड्स – ४,७९४

आयसीयू बेड्स – २,१८६

व्हेंटिलेटर्स - ५६०

Web Title: Why the broken corona chain in Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.