स्वच्छतेचा सुवर्ण ‘मध्य’ कधी गाठणार?
By Admin | Updated: May 7, 2017 02:15 IST2017-05-07T02:15:42+5:302017-05-07T02:15:42+5:30
राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर शहर १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे.

स्वच्छतेचा सुवर्ण ‘मध्य’ कधी गाठणार?
मोठमोठ्या स्वप्नांपूर्वी कचरा साफ करा : स्वच्छतेत माघारण्यासाठी जबाबदार कोण?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर शहर १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर लोकमत चमूला महाल, मोमीनपुरा, जागनाथ बुधवारी, पाचपावली, गरोबा मैदान, सतरंजीपुरा, गंजीपेठ, बजेरिया, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, गणेशपेठ, नवी शुक्रवारी, जुनी मंगळवारी, क्वेटा कॉलनी आदी भागांची पाहणी करून जागोजागी कचरा फेकला जात असल्याचे निदर्शनास आले. आमच्या प्रतिनिधीने त्यांची छायाचित्रेही काढली. बहुतांश उघडे प्लॉट, विहिरी, गल्ल्या आदी कचऱ्या फेकण्याचे स्थळ बनले आहेत. महालातून वाहणाऱ्या नाल्याला तर डोळ्यांनी पाहताही येऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी लोक कचरा न उचलला जात असल्याने प्रशासनाला धारेवर धरत आहेत.
नागपूर हे देशात सर्वाधिक गतीने विकास करीत असलेल्या शहरांमध्ये सामील आहे. आर्थिक घडामोडीही गतीने होत असताना नागरिकांद्वारे उत्पादनांचा उपयोगही वाढला आहे. खाण्याच्या वस्तू असो की वापरण्याच्या वस्तू, कपडे, फर्निचर आदी. प्रत्येक वस्तू उपभोगल्यावर ती सोडून दिली जाते. अशा सोडलेल्या वस्तूंची योग्यपणे विल्हेवाट लावली जात नसल्याने त्याला कचऱ्याचे स्वरूप प्राप्त होते. शहरात दररोज कित्येक टन कचरा निघतो. तो व्यवस्थित व नियमितपणे उचलला जात नसल्याने तो उघड्यावरच पसरतो. अशा वेळी स्वच्छतेच्या नावावर जनतेकडून वसूल करण्यात येत असलेल्या पैशाचे अखेर काय केले जाते, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांना मोठमोठे स्वप्न दाखविण्यापूर्वी शहरातील कचराच साफ करावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
आमदार म्हणतात, नेते व प्रशासन जबाबदार
मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही २० व्या क्रमांकावरून १३७ व्या क्रमांकावर पोहोचलो. हे आमच्यासाठी शरमेची बाब आहे. यासाठी आम्ही नेते आणि प्रशासन दोघेही जबाबदार आहोत. मला वाटते की, कचरा व्यवस्थापनाबाबत आमच्या नियोजनात काहीतरी गडबड आहे. हेच कारण आहे की आम्ही मागे पडलो. यासंदर्भात आ. कुंभारे यांनी हे आपले व्यक्तिगत मत असल्याचेही स्पष्ट केले.
अस्वच्छतेसाठी भाजपा नेतेच जबाबदार
काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी यासाठी भाजपाच्या नेत्यांना सर्वस्वी जबाबदार ठरविले आहे. मागील दहा वर्षांपासून मनपात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी भाजपाच जबाबदार आहे. भाजपा केंद्र आणि राज्य सरकारद्वारे स्वच्छता आणि व्यवस्थापनासाठी मिळत असलेल्या निधीचा योग्य उपयोग करीत नाही.