१०० टक्के विल्हेवाट अन् संकलन कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST2020-12-27T04:06:42+5:302020-12-27T04:06:42+5:30
५० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया : जीपीएस यंत्रणा असूनही कचऱ्याच्या तक्रारी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात दररोज १ ...

१०० टक्के विल्हेवाट अन् संकलन कधी होणार?
५० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया : जीपीएस यंत्रणा असूनही कचऱ्याच्या तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात दररोज १ हजार मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. हा कचरा २२ हेक्टर जमिनीवर पसरलेल्या भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे साठविला जातो. कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) करण्याची सुविधा नसल्याने दररोज ५०० मेट्रिक टन डम्प करावा लागतो. दुसरीकडे शहरालगतच्या भागात कचरा संकलन करणाऱ्या गाड्या दररोज पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील कचऱ्याची १०० टक्के विल्हेवाट व कचरा संकलनाची समस्या कधी सुटणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे १० लाख मेट्रिक टन कचऱ्यापैकी वर्षभरात २ लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. शहरात दररोज निघाणाऱ्या १ हजारपैकी २०० मेट्रिक टन कचऱ्यावर हंजर कंपनीकडून प्रक्रिया करून खत व आरडीएफ तयार केले जाते. २०० मे. टन ओल्या कचऱ्यावर रिसायकलिंग करून त्यापासून खत निर्माण केले जाते. तर ५०० मे. टन कचरा प्रक्रिया न करता डम्प करावा लागतो.
....
नियंत्रणासाठी जीपीएस यंत्रणा
शहारातील कचरा संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या दोन कंपन्यांकडे देण्यात आली आहे. डोअर टू डोअर संकलनासाठी कंपन्यांची ३५० वाहने असून कचरा वाहून नेण्यासाठी ५० मोठी वाहने आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर केला जातो. परंतु त्यानतंरही काही भागात कचरागाडी नियमित येत नसल्याच्या तक्रारी आहेत.
..
नियंत्रणाची जबाबदारी झोन कार्यालयांची
शहरातील कचरा संकलन व वाहून नेण्याची प्रक्रिया योग्यप्रकारे होते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या त्या त्या भागात झोन कार्यालयांची आहे. परंतु काही झोनमध्ये कचरा संकलन योग्यप्रकारे होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
...
१०० टक्के प्रक्रियेचा प्रयत्न
कचरा संकलन व कचरा प्रक्रिया सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया व्हावी, यासाठी नियोजन सुरू आहे. तसेच शहराच्या सर्व भागातील कचरा दररोज उचलला जावा, अशा सूचना कंपन्यांना व झोन कार्यालयांना दिल्या आहेत.
डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त (घनकचरा) मनपा
....
-शहरात दररोज निघणारा कचरा -१ हजार मेट्रिक टन
-डोअर टू डोअर जाणारी वाहने-३५०
-कचरा वाहून नेणारी वाहने -५०
- ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया
-५०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया न करता साठविला जातो.