देशाच्या शत्रूशी व्यवहार करण्याचे कारण काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 22:04 IST2022-02-23T22:03:28+5:302022-02-23T22:04:12+5:30
Nagpur News मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? अशा मंत्र्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजीनामा घ्यायला हवा, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देशाच्या शत्रूशी व्यवहार करण्याचे कारण काय?
नागपूर : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे रिअल इस्टेटचे व्यवहार मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून कसे होत होते हे समोर आले आहे. मुळात जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील, तर अशी बाब अतिशय गंभीर आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? अशा मंत्र्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजीनामा घ्यायला हवा, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. बुधवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये एक मोठी लिंक मिळाली, ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून होत आहेत, हे लक्षात आले. ८ ठिकाणी सर्च केल्यानंतर काही बाबी पुढे आल्या. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन घेतली. कोट्यवधीच्या रकमेच्या या सौद्यातील ५५ लाख रुपये हे हसिना पारकरला मिळाले. कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशा प्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट ईडीच्या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे, असे फडणवीस म्हणाले.
लवकरच मोठा खुलासा करणार
देशाच्या शत्रूला मदत करणाऱ्यांची गय केली जाऊ नये. माझ्याकडे जितके पुरावे होते, ते मी सर्व यंत्रणांना दिले होते. जर मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील तर राज्यातील राजकारणाचा स्तर आणखी खालावेल. देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात, पूर्ण सरकार त्याच्या पाठीशी उभे राहते, याचा देशात संदेश चांगला जाणार नाही. महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधी कसे खोटे पुरावे व साक्षी गोळा करतात, यासंदर्भात येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार, असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.