स्वातंत्र्य म्हणजे काय हो... दंडकारण्यातील आदिवासींचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 10:35 IST2021-08-16T10:33:30+5:302021-08-16T10:35:09+5:30

Nagpur News स्वातंत्र्य म्हणजे काय हो... असा प्रश्न दंडकारण्यातील आदिवासी मोडक्यातोडक्या मराठीत विचारत असतात. Independence Day

What is freedom ... The question of tribals in Gadchiroli | स्वातंत्र्य म्हणजे काय हो... दंडकारण्यातील आदिवासींचा सवाल

स्वातंत्र्य म्हणजे काय हो... दंडकारण्यातील आदिवासींचा सवाल

ठळक मुद्देभूसुरुंग, बंदुकीच्या गोळ्यांच्या धास्तीत जगतात आदिवासी

प्रवीण खापरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ब्रिटिशांच्या तावडीतून सुटून भारताचे स्वातंत्र्य आज ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मात्र, श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या दंडकारण्यात आजही विकासाची ज्योत प्रज्वलित झालेली नाही. आजही येथील लोक अर्धनग्न अवस्थेत वावरतात. शिक्षणाचा तर प्रश्नच नाही. महामार्ग मंजूर झालेत. मात्र, केवळ कागदापुरते. नक्षल्यांचे तांडव येथील आदिम जमात रोज अनुभवत असते. स्वातंत्र्य म्हणजे काय हो... असा प्रश्न येथील आदिम मोडक्यातोडक्या मराठीत विचारत असतात. (Independence Day, Trible, Gadchiroli)

दंडकारण्य अर्थात गडचिरोलीतील दुर्गम भागातील आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या नागपुरातील जनसंघर्ष समितीच्या सदस्यांनी भामरागड तालुक्यातील ११७ लोकवस्ती असलेल्या बंगाडी या छोट्या गावात पहिल्यांदा प्रवेश केला आणि ‘स्वातंत्र्यदिन म्हणजे काय’ हा प्रश्न कानी पडला. तेव्हापासून नागपूरपासून सुमारे ३५० किमी अंतर असलेल्या या गावात शैक्षणिक, वैद्यकीय कामे करण्यासाठी ही मंडळी दर आठवड्याला जातात. याच वर्षी २६ जानेवारीला गणराज्यदिन साजरा करत तिरंगा ध्वज फडकावला आणि त्याच वेळी गावात उभारण्यात आलेले नक्षली स्मारक कार्यकर्त्यांनी उद्ध्व‌स्त केले. नक्षल्यांच्या जबाबी कारवाईचा धोका माहीत असूनही नागपूरचे कार्यकर्ते तेथे देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पोहोचले आहेत.

 

उपचारासाठी डोंगर, नदी, नाले पार करावे लागतात

आदिवासी माडिया या आदिम जमातीतील लोकांचे हे गाव. येथे दीड वर्षापूर्वी वीज पोहोचली. मोबाइल नेटवर्क नाहीच. रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा स्वप्नांच्या गावीच. रुग्णाला उपचारासाठी डोंगर, नदी, नाले पार करीत कावड धरून डोंग्याने दहा किमी अंतरावरील लाहेरी येथे जावे लागते. प्रकृती जास्तच बिघडली तर लाहेरी येथून १९ किमी अंतरावर असलेल्या भामरागड येथे न्यावे लागते. भामरागडसाठी सकाळी एकच बस जाते आणि तीच संध्याकाळी परत येते.

कच्चे रस्ते, नक्षल्यांच्या कारवायांमुळे आदिम समुदाय दहशतीत असतो. तिरंगा झेंडा लावला तर तो काढला जातो, भारतमाता की जय म्हटले तर ठार मारले जाते. जोवर नक्षल्यांची भीती दूर होणार नाही, तोवर शैक्षणिक कार्य होणार नाही. ही बाब जाणूनच आम्ही तेथे कार्य सुरू केले आहे.

- दत्ता शिर्के, अध्यक्ष, जनसंघर्ष समिती

 

....................

Web Title: What is freedom ... The question of tribals in Gadchiroli