गोदामात सडलेले धान्य रेशन दुकानात
By Admin | Updated: September 20, 2015 03:10 IST2015-09-20T03:10:43+5:302015-09-20T03:10:43+5:30
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत नागपूर शहरातील रेशन दुकानांमध्ये पावसामुळे सडलेले व दुर्गंधी येत असलेल्या ...

गोदामात सडलेले धान्य रेशन दुकानात
कमलेश वानखेडे नागपूर
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत नागपूर शहरातील रेशन दुकानांमध्ये पावसामुळे सडलेले व दुर्गंधी येत असलेल्या धान्याचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अजबबंगलाजवळ असलेले शासकीय गोदाम पूर्णपणे भकास झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाने या गोदामाची देखभाल-दुरुस्ती केलेली नाही. गोदामाचे टिनचे शेड तुटले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी आत शिरून धान्याची पोती भिजत आहेत. परिणामी धान्याचा दुर्गंध येत आहे. अशा धान्याचा रेशन दुकानांमध्ये पुरवठा करून गरिबांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.
अजबबंगलाजवळील हे गोदाम जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली येते. अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे गोदामाच्या देखभाल - दुरुस्तीची जबाबदारी आहे. तर येथे येणारे धान्य साठवणे, त्याची उचल करून रेशन दुकानदारांना पुरवठा करण्याचे काम नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत एफसीआयकडून पाठविण्यात आलेले गहू, तांदूळ, साखर, डाळ असे सुमारे दोन हजार मेट्रिक टन धान्य या गोदामातील पाचही ब्लॉकमध्ये साठवून ठेवले जाते. येथून नागपूर शहरातील रेशन दुकानांना धान्याचा पुरवठा केला जातो. दररोज माल येणे व नेणे सुरू असते. गोदामाची इमारत सुमारे ७० वर्षे जुनी आहे. या गोदामाची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाची आहे. मात्र, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत या गोदामाची गेल्या काही वर्षांपासून देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे व कित्येक वर्षांपासून गोदामाला साधा चुनादेखील मारलेला नसल्याचे निदर्शनास आले. गोदामाची नियमित साफसफाईदेखील केली जात नाही. गोदामातील भिंतींना मोठमोठे जाळे लागल्याचे पाहायला मिळते. गोदामावर टिनाचे शेड असून काही ठिकाणी त्या टिनाला छिद्र पडले असल्यामुळे पावसाळ्यात पाणी गळते. भिंतींमधूनही पावसाचे पाणी झिरपते. गोदामाच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात ओल असल्याचे दिसून आले. पावसाचे पाणी गळल्यामुळे गोदामातील धान्य काही प्रमाणात सडले. या धान्याची दुर्गंधी येते. सडका वास येत असलेले हेच दुर्गंधीयुक्त धान्य रेशन दुकानदारांना पुरवठा केले जाते. या सडलेल्या धान्याचा येथे एवढा दुर्गंध येतो की गोदामात पाच मिनिट बसणेही कठीण होते. मात्र, येथे काम करणाऱ्या कामगारांना अशाही परिस्थितीत येथेच बसून जेवणाचा डबा खावा लागतो.
गोदामाच्या बाहेर फ्लोरिंग केलेले नाही. त्यामुळे ट्रकमधून पोती काढून गोदामात ठेवताना धान्य खाली पडते, नंतर ते मातीमिश्रित धान्य उचलून पोत्यांमध्ये भरले जाते. पावसाळ्यात तर संपूर्ण चिखल असतो. त्यामुळे चिखलात सांडलेले धान्यही जमा करून नंतर पोत्यांमध्ये भरले जाते. बाहेरच्या व्हरांड्याची स्थिती तर आणखीनच वाईट आहे. गोदामात जागा नसल्यामुळे बाहेर व्हरांड्यातच वजनकाटा लावून धान्याचे वजन केले जाते. वजन सुरू असताना पाऊस आला तर व्हरांड्यात काढलेले सर्वच्यासर्व धान्य भिजते. त्यामुळे ते वाळवून पुन्हा पोत्यात भरून रेशन दुकानदारांकडे पाठविले जाते. येथील कामगारांनी तसेच वखार महामंडळानेही अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना वारंवार पत्र पाठवून गोदामाची दुरुस्ती करण्याची मागणी केली; मात्र त्याकडे अजिबात लक्ष दिले गेले नाही.
गोदामात लाईटही नाही
गोदामात धान्याची पोती ठेवण्याचे व काढण्याचे काम सायंकाळी ६ वाजतापर्यंत केले जाते. मात्र एखाद्या वेळी माल घेऊन येणारा ट्रक उशिरा आला तर मात्र धान्याच्या पोत्यांची गोदामात थप्पी लावायला रात्र होते. अजबबंगला परिसरातील या पाचही गोदामात वीजपुरवठा नाही. त्यामुळे सायंकाळ होताच अंधार पसरतो. अशापरिस्थितीत येथे काम करणाऱ्या कामगारांना मेणबत्तीच्या प्रकाशात किंवा टॉर्च लावून तब्बल २० पोत्यांची उंच थप्पी मारावी लागते. कमी प्रकाशामुळे एखाद्या कामगाराचा पाय घसरला तर संपूर्ण पोती त्याच्या अंगावर पडून त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र असे असतानाही गेल्या १० वर्षांत गोदामात एक साधा लाईट लावण्याची तसदीही पुरवठा विभागाने घेतलेली नाही.