गडचिरोली व नागपूर येथे दोन हेलीकॉप्टर, भारतीय सैन्य दलाची चमू सज्ज; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
By आनंद डेकाटे | Updated: July 9, 2025 23:21 IST2025-07-09T23:20:09+5:302025-07-09T23:21:56+5:30
अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज, विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

गडचिरोली व नागपूर येथे दोन हेलीकॉप्टर, भारतीय सैन्य दलाची चमू सज्ज; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
नागपूर : अतिवृष्टीमूळे निर्माण झालेल्या परिस्थीतीचा सामना करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज असून सद्या पुरपरिस्थिती नियंत्रणात आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्यामुळे येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल सज्ज ठेवण्यात आले आहे. यासोबतच गडचिरोली व नागपूर येथे दोन हेलीकॉप्टर, भारतीय सैन्य दलाची चमू सज्ज असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मदत व बचाव कार्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती विभागील आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील अतिवृष्टी व पुरबाधित जिल्ह्यांचा आढावा बिदरी यांनी घेतला त्याप्रसंगी जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला यावेळी दिल्यात. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता गवळी, महसूल अपर आयुक्त राजेश खवले तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्तालयाचे प्रतिनिधी, जलसंपदा आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
विभागात सात मृत्यू ,११७ घरांचे पूर्णत: नुकसान
अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे विभागात सात व्यक्ती मृत झाले असून यामध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक, गोंदिया जिल्ह्यात तीन तर गडचिरोली जिल्ह्यात दोघांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे विभागात १,१९० घरांचे अशंत: तर ११७ घरांचे पुर्णत: नुकसान झाले आहेत. ११७ जणावरांच्या गोठांचेही नुकसान झाले आहेत. अतिवृष्टी व पुरामुळे सुरक्षीतस्थळी स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांमध्ये नागपूर जिल्ह्यातील १३८, नागपूर शहरातील ५९ घरांमध्ये पाणी शिरले असून ५७ लोकांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले. भंडारा जिल्ह्यात ३०६ कुटुंबांना, गडचिरोली जिल्ह्यात १५७ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
रस्ते, पुलांचे नुकसान, वाहतूक विस्कळीत
पुरामुळे वर्धा जिल्ह्यातील रस्ते व पुलांचे नुकसान झाले असून ११ ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर जिल्ह्यात २३ ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ८० रस्ते बाधित झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात २१ रस्ते बंद आहे तर गोंदिया जिल्ह्यातील ९ रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.
गोसेखूर्दचे ३३ दरवाजे उघडले
गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असून ५.२९ लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. भंडारा शहरालगत पुर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून सर्व गेट बंद ठेवून पंप कार्यान्वित करण्यात आले त्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी वडसा येथे धोकापातळीचे एक फुट वर वाहत आहे. नदीकाठच्या गावांना पुरपरिस्थितीबाबत सूचना देण्यात आल्या आहे. मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे दोन गेट उघडण्यात आले त्यातून ९ हजार क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.