व्हिसा मंजुरीसाठी करावे लागत आहे दिव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:51 IST2020-10-12T12:49:48+5:302020-10-12T12:51:24+5:30

visa Nagpur News नागरिकांचे हित लक्षात घेता नागपुरातदेखील व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांची मोठी अडचण दूर होऊ शकेल.

Trouble for visa approval | व्हिसा मंजुरीसाठी करावे लागत आहे दिव्य

व्हिसा मंजुरीसाठी करावे लागत आहे दिव्य

ठळक मुद्देनागपुरातच कार्यालय सुरू करण्याची मागणीज्येष्ठ नागरिकांना जास्त अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील लोक मोठ्या प्रमाणावर विदेशात असून त्यांच्या नातेवाईकांचे तिकडे जाणे-येणे सुरू असते. मात्र त्यांना व्हिसासाठी मुंबई-पुण्याकडे धाव घ्यावी लागते. कोरोनाच्या संसगार्मुळे वाहतुकीची साधनेदेखील सहजपणे उपलब्ध नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी तर बाहेरगावी प्रवास करणे धोक्याचेदेखील ठरू शकते. नागरिकांचे हित लक्षात घेता नागपुरातदेखील व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांची मोठी अडचण दूर होऊ शकेल.

नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावतीसह विदर्भातील हजारो तरुण विदेशांमध्ये शिक्षण किंवा रोजगारानिमित्त गेलेले आहेत. काही जण तर तेथे स्थायिकदेखील झाले आहेत. त्यांच्याकडे जाण्यासाठी कुटुंबातील लोकांना व्हिसा घेणे आवश्यक असते. मात्र त्यासाठी मोठ्या शहरात जावे लागते. या प्रक्रियेत २ ते ३ दिवस जातात. अशा स्थितीत त्यांची अडचण होते. विशेषत: अनलॉकडाऊनचे टप्पे सुरू झाले असले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टाळण्यावरच लोकांचा भर आहे. लोक विमान, बसने प्रवास करणे टाळत आहे. खासगी वाहनाने गेले तर जाण्यासाठीच १६ ते २२ तास लागत आहे. इतका दूरचा प्रवास करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक होते.

नागपूर देशाचे केंद्रस्थान आहे. येथे व्हिसा कार्यालय सुरू झाले तर मध्य भारतातील लोकांनादेखील त्याचा फायदा होईल. त्यामुळेच येथे व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात केशव कुकडे, माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रदेखील लिहिले आहे.

Web Title: Trouble for visa approval

टॅग्स :Visaव्हिसा