वाघांची प्रगणना झालीच नाही!
By Admin | Updated: May 27, 2014 01:50 IST2014-05-27T01:50:19+5:302014-05-27T01:50:19+5:30
बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरून दरवर्षी प्राण्यांची गणना केली जाते. मचाणीवर रात्रंदिवस बसून प्राण्यांची गणना केली जाते. मात्र यावर्षी मध्य चांदा वनविकास मंडळाने

वाघांची प्रगणना झालीच नाही!
वनविकास महामंडळातील प्रकार : टेबलवरच तयार झाला अहवाल
सुरेश रंगारी - कोठारी (चंद्रपूर)
बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरून दरवर्षी प्राण्यांची गणना केली जाते. मचाणीवर रात्रंदिवस बसून प्राण्यांची गणना केली जाते. मात्र यावर्षी मध्य चांदा वनविकास मंडळाने प्राण्यांची गणनाच केली नाही. घरी बसूनच प्राणिगणना केल्याचा अहवाल उशिरा वरिष्ठांना पाठविला आहे. मध्य चांदा वनप्रकल्प बल्लारपूर अंतर्गत झरण, कन्हारगाव, तोहगाव व धाबा असे चार वनक्षेत्र आहेत. या क्षेत्रात ३२ हजार हेक्टर जंगल पसरले आहे. वाघ, बिबट्यासह अनेक वन्य प्राण्यांची संख्या विपुल आहे. या क्षेत्रात प्राण्यांना निवास, पाणी व खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने दिवसागणिक प्राण्यांची संख्या वाढत आहे. वाढणार्या प्राण्यांचा उपद्रव गावकर्यांना विविध प्रकारे सहन करावा लागतो. याच क्षेत्रात वाघाने तीन जणांना ठार केल्याची घटना अगदी ताजी आहे. वाघाच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. या क्षेत्रात असणार्या प्राण्यांची गणना करून संख्या ठरवायची होती. मागील वर्षीच्या तुलनेत प्राणी वाढले की कमी झालेत, याचा आढावा प्रगणनेच्या माध्यमातून घ्यायचा होता. त्यासाठी वनविकास महामंडळाच्या अधिकार्यांनी महिनाभरापासून तयारी सुरू करून पाणवठ्यावर मचाणी उभारण्याचे काम केले. लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र १४ मे रोजी या मचाणीपर्यंत कुणीही पोहचले नाही. ३२ मचाणींवर ६०-७० मजुरांची नेमणूक करण्यात आली. सोबतीला वन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु पावसाचा बहाणा करून प्राणिगणनेसाठी कुणालाही पाठविण्यात आले नाही. सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, वन्यप्राणी प्रेमी व अभ्यासक तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पाचारण करण्याचे सौजन्य वन विकास महामंडळाने दाखविले नाही. प्राण्यांचे फोटो घेण्यासाठी एका पाणवठ्यावर चार कॅमेरे लावण्याचे ठरले. मात्र तेदेखील लावण्यात आले नाही. त्यामुळे कॅमेर्यात कोणत्याही प्राण्यांचा फोटो, त्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या नाहीत. वन अधिकार्यांनी घरी बसूनच प्राणिगणना केल्याचा देखावा निर्माण केला. त्यांच्या गणनेत एकही वाघ, बिबट आढळला नाही. केवळ रानडुक्कर, वानर व हरिण आणि चितळाचे कळप दाखविण्यात आले. या क्षेत्रात वाघांची संख्या भरपूर असताना संबंधितांना एकही वाघ कसा काय दिसला नाही, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. प्राणिगणनेसाठी या विभागाने लाखो रुपयांचा खर्च दाखविला. नवीन मचाणी उभारल्याचे, पाणवठे तयार केल्याचे, रस्ते बनविल्याचे तसेच महिनाभरापासून मजूर काम करीत असल्याचे दाखवून शासनाच्या लाखो रुपयाला चुना लावण्यात आला आहे. वास्तविक मचाणी जुन्याच, पानवठे जुनेच आहेत. त्यात मजुरदेखील महिनाभरापासून काम करीत नसल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. प्राणिगणना करण्यात कुचराई करुन लाखोंचा अपव्यय करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.