लोकमत न्यूज नेटवर्ककामठी : महाविद्यालयांत प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला असून दाखले देण्यासाठी राज्याचे मुख्य संकेतस्थळच वारंवार बंद होत असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया बारगळली आहे.
शहरातील तसेच ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे दाखले अडकले आहेत. परिणामी, विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. तसेच महा ई-सेवा केंद्रचालकांना एकाच लॉगिनवरून काम करावे लागत असल्याने केंद्रांमधून दररोज दिल्या जाणाऱ्या दाखल्यांचे प्रमाण तब्बल ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळेही, दाखले देण्यात अडचणी येत आहेत.
जून व जुलै महिना महाविद्यालयांच्या प्रवेशाचा काळ असल्याने विद्यार्थी तसेच पालकांना महा ई-सेवा केंद्रांवर हेलपाटे मारावे लागतात. प्रवेशांसाठी अद्ययावत दाखल्यांची मागणी होत असल्याने विद्यार्थ्यांना नव्याने दाखले काढण्यासाठी अर्ज करावे लागतात. त्यामुळे, वेळेपूर्वी दाखले काढावेत, असे प्रशासनाचे आवाहन कुचकामी ठरत आहे. या कालावधीत दाखल्यांसाठी झुंबड उडणे नित्याचेच झाले आहे. हे दाखले विद्यार्थ्यांना वेळेत मिळावेत, तसेच यातील गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' अर्थात 'फिफो' ही प्रणाली लागू केली होती. मात्र, दाखले देताना मोठा गोंधळ उडाल्याने ही प्रणाली रद्द करण्यात आली होती.
त्यानंतर, महाऑनलाइन प्रणालीतून ऑनलाइन तसेच प्राधान्यक्रमानुसार दाखले देण्यात येत आहेत. मात्र, राज्य सरकारचे मुख्य संकेतस्थळ वारंवार बंद होणे किंवा संकेतस्थळाची गती मंद असल्याने आणखी गोंधळ उडाला आहे. त्यामुळे, शहरातील आणि ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे दाखले अडकून पडले आहेत. यात जातप्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, रहिवास, उत्पन्नाचा दाखला यांचा समावेश आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
तत्काळ तोडगा काढण्याची मागणीनागरिकांना तासनतास केंद्रांत रांगेत उभे राहावे लागत आहे. वेळेत काम न झाल्यास अर्जदारांची कागदपत्रे जाम करून रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर कागदपत्रे अपलोड करावी लागत आहेत. त्यानंतर अर्ज दाखल होत आहेत. मुख्य संकेतस्थळ संथ असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध प्रकारचे दाखले अडकले आहेत. दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक वारंवार विचारणा करत असून, त्यातून वादाचे प्रसंगही उद्भवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केंद्रचालकांकडून होत आहे.
एकाच लॉगिनवरून काम करण्याची परवानगीकेंद्रांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी एका केंद्रावर एकाच लॉगिनमधून काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पूर्वी एका केंद्रावरील काम अन्य दोन किंवा तीन ठिकाणांहून केले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे, राज्य सरकारने यात बदल करून एका केंद्रावर एकाच लॉगिनवरून दाखल्यांचे काम केले जात आहे. सध्या केंद्रचालकांकडील एका संगणकावर लॉगिन सुरू असताना अन्य ठिकाणी काम सुरू केल्यास पहिल्या संगणकावरील काम बंद पडत आहे. त्यामुळे अन्य संगणकांवर काम होत नसल्याने दाखल्यांसाठी अर्ज प्रक्रिया संथ झाली आहे.