आरक्षण आहे पण अधिकार नाही ?

By Admin | Updated: November 7, 2016 02:51 IST2016-11-07T02:51:16+5:302016-11-07T02:51:16+5:30

आज सर्वत्र स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी सांगितल्या जात आहे. मात्र प्रत्यक्षात घरोघरी महिलेचा आवाज दाबला जात आहे.

There is a reservation but not the right? | आरक्षण आहे पण अधिकार नाही ?

आरक्षण आहे पण अधिकार नाही ?

महिलामुक्तीचा लढा सक्रिय होणार : ओबीसी महिला महासंघ देणार ताकद
नागपूर : आज सर्वत्र स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी सांगितल्या जात आहे. मात्र प्रत्यक्षात घरोघरी महिलेचा आवाज दाबला जात आहे. मनुस्मृतीपासून तिच्यावर सतत अन्याय-अत्याचार होत आला आहे, आणि स्त्री तो अन्याय मुकाट्याने सहन करीत आली आहे. आजची महिला ही सुशिक्षित आहे. सक्षम आहे. आरक्षण आहे. शिवाय कायद्याचे संरक्षणही आहेत. मात्र एवढे सर्व काही असताना ती आजही परावलंबी आहे. तिला अजूनपर्यंत स्वत:चे अधिकारी आणि हक्काची ओळख झालेली नाही. त्यामुळे आजही पुरुष हाच अधिकार गाजवत आहे. अशा या पुरुषप्रधान संस्कृतीच्या जोखडातून महिला मुक्त कधी होणार, असा सवाल ओबीसी महिला महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ व्यासपीठाच्या मंचावर उपस्थित केला.
या चर्चेत महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमा भड, मुख्य कार्यकारी अध्यक्षा डॉ. शरयू तायवाडे, कार्याध्यक्ष डॉ. रेखा बारहाते, जयश्री थोटे, साधना बोरकर, अरुणा भोंडे, नंदा देशमुख, अ‍ॅड़ देविशा दहीकर, अ‍ॅड़ समीक्षा गणेशे, अर्चना बरडे, प्रमिला पवार, अंजली बारहाते, उषा देशमुख, सुरेखा रडके, अर्चना डेबरे, शुभांगी घाटोळे, वैशाली बुजाडे व सुधा कारवटकर यांनी भाग घेतला होता. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री-मुक्ती चळवळी उभी केली. शिवाय आज ती चळवळ नवीन टप्प्यावर उभी आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणून या देशातील महिलांना हजारो वर्षांच्या गुलामीतून मुक्त केले. शिवाय त्यांना समानतेचे अधिकार दिले. तसेच अनेक महापुरुषांनी महिलांच्या कल्याणासाठी काम केले. परंतु त्याचा फायदा केवळ मूठभर उच्चवर्णीय महिलांनी घेतला आणि ओबीसी महिला आजही मागे आहेत. रुढी परंपरात अडकून आहेत. ओबीसी महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी ओबीसी महिला महासंघ कटिबद्घ असल्याचा विश्वास यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)

महिलांसाठी ‘फुंकर’
समाजातील पीडित महिलांना बळ मिळावे, त्यांना एक आधार मिळावा आणि त्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी ओबीसी महिला महासंघाच्यावतीने ‘फुंकर’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात महिला मेळावे, चर्चासत्रे व परिसंवादाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन केले जाईल. शिवाय त्यांना त्यांचे अधिकार व हक्काची ओळख करून दिली जाईल. या उपक्रमाच्या माध्यमातून ओबीसी समाजातील महिलांना महासंघाशी जोडण्याचासुद्धा प्रयोग केला जाणार आहे. विशेष म्हणजे,यापूर्वी कधीच ओबीसी महिलांसाठी अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात आलेला नाही.
असा आहे ओबीसी महिला महासंघ
अध्यक्षा सुषमा भड, मुख्य कार्यकारी अध्यक्षा डॉ. शरयू तायवाडे, कार्याध्यक्षा डॉ. रेखा बारहाते, उपाध्यक्षा अंजली बारहाते, आशा राऊत, अ‍ॅड़ समीक्षा गणेशे, अर्चना टेंभरे, अनिता ठेंगरे, मनीषा राजेकर, महासचिव वृंदा ठाकरे, सचिव कल्पना मानकर, सहसचिव सुनीता जिचकार, वंदना वनकर, सुधा राणा, कोषाध्यक्ष नंदा देशमुख, सहकोषाध्यक्ष साधना बोरकर, प्रवक्ता अरुणा भोंडे, प्रसिद्धीप्रमुख शुभांगी घाटोळे, सदस्या उज्ज्वला मस्के, संगीता जावहे, अर्चना बरडे, मेघना कुडे, मंजुषा सावरकर, ललिता भांडारकर, अंजू देवासे, वैशाली भुजाडे, उषा देशमुख, सुरेखा रडके, आशा गोपालपुरे, वैशाली वानखेडे, वर्षा रामटेककर व चंद्रकला चिकाणे यांचा समावेश आहे.

महिलांच्या हक्काचा लढा
महिला वर्षानुवर्षांपासून अन्याय-अत्याचार सहन करीत आल्या आहेत. त्यांच्या या अन्यायाला वाचा फोडणे हाच ओबीसी महिला महासंघाचा मुख्य उद्देश आहे. शिवाय समाजात रुजलेल्या अनिष्ट रूढी-परंपरांच्या बेड्यातून महिलेला मुक्त करायचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून २७ नाव्हेंबर रोजी नागपुरात ओबीसी महिला महाअधिवेशन आयोजित केले आहे. या महाअधिवेशनात महिलांचे अधिकार, हक्क आणि त्यांच्यावरील अन्याय-अत्याचारावर परिसंवाद होणार आहे. विशेष म्हणजे, या महाअधिवेशनापासून ही केवळ सुरुवात असून, हा लढा यापुढेही असाच सुरू राहणार आहे.
- सुषमा भड, अध्यक्षा, ओबीसी महिला महासंघ.

महिलांनी घराबाहेर पडावे
मनुवादी विचारांनी समाजात महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले आहे. त्यामुळे महिलांचा विकास होऊ शकला नाही. महिला या अंधकारातच राहिल्या. शिवाय त्याचा फायदा पुरुषांनी घेतला आहे. त्यांनी महिलांवर अधिकार गाजविला आहे. आजही महिलांसाठी अनेक कायदे आहेत, परंतु महिलांना त्या कायद्याची माहिती नाही. त्यामुळे त्या अधिकाराविषयी बोलू शकत नाही. पुरुषांच्या दबावात महिलांनी स्वत:चा आत्मविश्वास गमावला आहे. तो त्यांच्यात पुन्हा निर्माण करून, त्यांना स्वावलंबी बनवावे लागेल. मात्र यासाठी महिलांनी आपली मानसिकता बदलून घराबाहेर पडले पाहिले. नवीन विचार स्वीकारले पाहिजे.
- डॉ. रेखा बारहाते, कार्याध्यक्षा - ओबीसी महिला महासंघ.

महिलांना सुरक्षा कवच मिळावे
आज समाजातील प्रत्येक स्त्री ही स्वत:ला असुरक्षित समजत आहे. त्यासाठी समाजात तसे वातावरण तयार झाले आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अशा स्थितीत शासनाने महिलांना सुरक्षेची हमी दिली पाहिजे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांच्या कामाची कोणतीही वेळ मर्यादा राहिलेली नाही. समाजातील सध्याच्या वातावरणात नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा महिलांना सरकारकडून सुरक्षा कवच मिळालेच पाहिजे.
- डॉ. शरयू तायवाडे,
मुख्य कार्यकारी अध्यक्षा - ओबीसी महिला महासंघ.

महिलांनी स्वत:ची ताकद ओळखावी
संविधानाने महिलांना अधिकार दिले. त्यांच्यासाठी वेगवेगळे कायदे झाले. पण त्यांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने महिलांवर आज अन्याय-अत्याचार होत आहे. महिला अज्ञानात खितपत पडल्या आहेत. यासाठी महिलांनी स्वत:च संविधानातील आपले अधिकार आणि हक्काची जाणीव करून घेतल्यास त्यांचे आंधळेपण दूर होईल. शिवाय त्यांच्यात एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल. मात्र त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे. शिवाय स्वावलंबी झाले पाहिजे. ओबीसी महिला ही सक्षम आहे. सुशिक्षित आहे. तिने स्वत:ची ताकद ओळखण्याची गरज आहे.
- अ‍ॅड़ समीक्षा गणेशे, ओबीसी महिला महासंघ.

Web Title: There is a reservation but not the right?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.