शिक्षणक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन हवे
By Admin | Updated: November 26, 2014 01:04 IST2014-11-26T01:04:46+5:302014-11-26T01:04:46+5:30
आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन मार्गाचा शोध आहे. जुन्या प्रणालीला ते कुठेतरी कंटाळले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे.

शिक्षणक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन हवे
मोहन भागवत : पुनरुत्थान विद्यापीठाच्या विद्वत परिषदेला प्रारंभ
नागपूर : आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन मार्गाचा शोध आहे. जुन्या प्रणालीला ते कुठेतरी कंटाळले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे. परंतु हे परिवर्तन होत असताना नवीन समस्या उत्पन्न होणार नाही याचीदेखील काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. केंद्रातील भाजपा सरकारला शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी अप्रत्यक्षपणे संदेशच दिला आहे. गुजरात पुनरुत्थान विद्यापीठाच्यावतीने रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृह येथे दोन दिवसीय अखिल भारतीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ‘शिक्षणाच्या वर्तमान स्थितीत करणीय कार्य’ या विषयावर सरसंघचालक बोलत होते.
शिक्षणामुळे संपूर्ण पिढीला आणि पर्यायाने राष्ट्राला दिशा मिळते. देशातील ब्रिटिशकालीन शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा यात समावेश करायला हवा.
आपले पारंपरिक ज्ञान आपण हरवले आहे. त्याला समजून आत्मसात करावे लागेल. याकरिता चिंतनासोबतच चळवळ उभारावी लागेल, असे डॉ.भागवत म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदप्रभू महाराज यांनी आपले विचार मांडले. शिक्षणात व्यवहार, आदर्श आणि प्रेम या मूल्यांचा समन्वय हवा. आधुनिक शिक्षणप्रणाली ही चेतना, स्वाभिमान व संबंध यांची कत्तल करत आहे. यात बदल होणे आवश्यकच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
परिषदेत देशभरातील तब्बल ३५० प्रतिनिधी सहभागी झाले असून यात निरनिराळ्या विद्यापीठांचे कुलगुरू व प्राध्यापकांचा सहभाग आहे. या परिषदेच्या माध्यमाने राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना व स्वरूप, राष्ट्र, राष्ट्रीयता आणि राष्ट्रीय शिक्षण या विषयांवर वैचारिक मंथन होणार आहे. पुनरुत्थान विद्यापीठाच्या संयोजिका इंदूमती काटदरे या यावेळी उपस्थित होत्या. सहसंयोजक दिलीप केळकर यांनी प्रस्तावना मांडली. (प्रतिनिधी)
शिक्षकांमध्ये जागृती हवी
जगाचे लक्ष आपल्या देशाकडे लागले आहे. आपला व्यक्ती बाहेर गेल्यावर त्याला शिकायला मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षणातील स्थापित विचारांना धक्का द्यावा लागेल. विशेषत: शिक्षकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. ते शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत शिवाय पारंपरिक शिक्षणप्रणालीत काम करणाऱ्या संघटनेबाहेरील व्यक्तींजवळ जाऊन प्रयोग, अनुभव यांचे आदानप्रदान करावे लागेल, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.