डोकलाममध्ये कसलाही तणाव नाही, बांधकामविषयक बातम्या या केवळ अफवा; व्ही.के.सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:15 IST2017-11-29T18:12:51+5:302017-11-29T18:15:58+5:30
डोकलामनजीक सीमेवर चीनकडून विविध बांधकामे सुरू असल्याची बाब ही केवळ अफवा आहे. डोकलाममध्ये सद्यस्थितीत कुठलेही तणावाचे वातावरण नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असा दावा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंह यांनी केला आहे.

डोकलाममध्ये कसलाही तणाव नाही, बांधकामविषयक बातम्या या केवळ अफवा; व्ही.के.सिंह
आॅनलाईन लोकमत
नागपूर : डोकलामनजीक सीमेवर चीनकडून विविध बांधकामे सुरू असल्याची बाब ही केवळ अफवा आहे. डोकलाममध्ये सद्यस्थितीत कुठलेही तणावाचे वातावरण नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असा दावा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंह यांनी केला आहे. सहाव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे, परिषदेचे ‘पॅट्रन’ देवेंद्र दस्तुरे, निमंत्रक डॉ.मृणालिनी दस्तुरे, रसिका दस्तुरे प्रामुख्याने उपस्थित होते.
डोकलाम परिसरातून चीनने माघार घेतली असली तरी सीमेपासून जवळच चीनच्या सैनिकांनी तळ ठोकला आहे. तसेच त्या परिसरात चीनने ४०० मीटर उंचीची भिंत उभारली आहे, अशी माहिती समोर आली होती. यासंदर्भात विचारणा केली असता डोकलाम परिसरात चीनच्या काहीच हालचाली नाहीत. यासंदर्भात पुढे आलेली माहिती, बातम्या तथ्यावर आधारित नसून केवळ अफवा आहेत. त्यामुळे तूर्तास डोकलामवरून कुठल्याही द्विपक्षीय वादाची शक्यता नसल्याचे प्रतिपादन व्ही.के.सिंह यांनी केले.
आपल्या देशातील शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. अभ्यासक्रम, पुस्तके अक्षरश: संभ्रम वाढविणारी आहेत. भारताबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यापेक्षा इतर देशातील इतिहास, भौगोलिक-आर्थिक स्थिती यावर जास्त भर देण्यात येतो. या सर्वांची आवश्यकता नाही. अगोदर देशाबाबत विद्यार्थ्यांना कळले पाहिजे, असे व्ही.के.सिंह यांनी स्पष्ट केले. विविध देशातील ‘व्हिसा’ नियम बदलल्याचा फटका भारतीय ‘आयटी’ तज्ज्ञांना बसतो आहे. इतर देशांच्या नियमांवर आपण काही बोलू शकत नाही, मात्र त्यांच्या आर्थिक विकासात मौलिक वाटा उचलणाऱ्या भारतीयांच्या हक्कांच्या रक्षणासाठी मंत्रालय तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाचा बाजार थांबला पाहिजे
आज शिक्षणप्रणाली हा एक व्यवसाय झाला असून शिक्षण एखाद्या उत्पादनाप्रमाणे विकले जाते. ही बाब अयोग्य आहे. विद्यार्थी व शिक्षकांमधील संवादाचा व आपुलकीचा धागा तुटतो आहे. त्यामुळे मुलांमधील संयमदेखील सुटत चालला आहे. विद्यार्थ्यांमध्ये संयमाची वाढ व्हावी व प्रणालीवरील त्यांचा विश्वास वाढावा यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शिक्षक प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना समजून घ्यावे, असे आवाहन व्ही.के.सिंह यांनी केले.
अण्णांच्या आंदोलनात जाणार नाही
सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर व्ही.के.सिंह यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत विविध राज्यांची यात्रा केली होती. अण्णा हजारे जनलोकपालच्या मुद्यावर परत एकदा आंदोलन करणार आहेत. यावेळी अण्णांच्या आंदोलनात जाणार नसल्याचे व्ही.के.सिंह यांनी स्पष्ट केले. मी आता राजकारणात आहे व राजकारणी व्यक्तीने आंदोलनात समाविष्ट व्हायला नको, अशी अण्णांची अगोदरपासूनची भूमिका आहे, असे सिंह यांनी सांगितले.