समाजातील बदलासाठी कृती करा
By Admin | Updated: November 24, 2014 01:20 IST2014-11-24T01:20:24+5:302014-11-24T01:20:24+5:30
प्रत्येकाने कर्मप्रधान असायला हवे. कर्म करीत रहा, फळाची आशा करू नका. समाजात आमूलाग्र बदल घडवायचे असल्यास कृती करा. त्याला सकारात्मकतेची जोड द्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध होमिओपॅथी

समाजातील बदलासाठी कृती करा
गुरुदेव फाऊंडेशनची स्थापना
नागपूर : प्रत्येकाने कर्मप्रधान असायला हवे. कर्म करीत रहा, फळाची आशा करू नका. समाजात आमूलाग्र बदल घडवायचे असल्यास कृती करा. त्याला सकारात्मकतेची जोड द्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे यांनी येथे केले.
‘सिकलसेल-थॅलेसेमिया’ रुग्णांना विशेष रक्तपुरवठा करण्यासाठी गुरुदेव फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाऊंडेशनचा शुभारंभ रविवारी सायंकाळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री जुही चावला यांच्या हस्ते झाला.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मिलिंद माने, आंतरभारती आश्रमचे संचालक डॉ. भाऊ झिटे, डॉ. मनीष मेहता, सकल जैन समाजाचे निखील कुसुमगर, थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी, देवंग बावाशी, लाईफ लाईन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरीश वरभे व डॉ. वनश्री वरभे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. डांगरे म्हणाले, देवावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. परंतु ज्याचा आदर करता त्याला गुरु मानून आयुष्य जगा, असे म्हणत त्यांनी फाऊंडेशनच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जुही चावला यांनी तीन मित्रांची गोष्ट सांगून जीवनातील कार्याचे महत्त्व विषद केले. त्या म्हणाल्या, पैसा, संपत्ती या गोष्टी मृत्यूनंतर सोबत राहत नाही, परंतु त्यांचे कार्य सोबत राहते, म्हणून चांगले कार्य करा. गुरुदेव फाऊंडेशनशी मी जुळली आहे, आपणही यात सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. आ. माने म्हणाले, सिकलसेल व थॅलेसेमियाच्याबाबत अजूनही जनजागृती नाही. यामुळे रुग्णांची संख्या वाढतच आहे. हा आजार होऊच नये यासाठी डॉक्टरांसोबतच प्रत्येक व्यक्तीने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.
उद्घाटनीय भाषण डॉ. वनश्री वरभे यांनी केले. डॉ. हरीश वरभे यांनी आपल्या प्रास्तविकात गुरुदेव फाऊंडेशनची स्थापना करण्यामागची भूमिका विषद केली. सोबतच पॉवर पार्इंट प्रेझेन्टेशनच्या मदतीने सिकलसेल व थॅलेसेमिया आजाराची माहिती देऊन त्यावरील उपाययोजना व औषधोपचारावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. राजीव मोहता यांनी केले.
दरम्यान लोकमत चौक येथून ‘सिकलसेल-थॅलेसेमिया’ निर्मूलन रॅली काढण्यात आली. या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी रॅलीत ३० विविध शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)