आरटीओ दक्षता पथकावर रेतीमाफियांची पाळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST2020-11-28T04:05:54+5:302020-11-28T04:05:54+5:30
जगदीश जोशी नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुंबईतून आलेले दक्षता पथक नागपूरमध्ये दोन दिवसापासून ठिय्या मांडून ...

आरटीओ दक्षता पथकावर रेतीमाफियांची पाळत
जगदीश जोशी
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुंबईतून आलेले दक्षता पथक नागपूरमध्ये दोन दिवसापासून ठिय्या मांडून आहे. परंतु, त्यांना अद्याप समाधानकारक यश मिळाले नाही. हे पथक सिव्हिल लाईन्स येथील रविभवनमध्ये थांबले आहे. रेतीमाफियांनी या पथकावर सतत लक्ष ठेवण्यासाठी आठ तरुणांना तैनात केले आहे. ते तरुण दक्षता पथकाचा सावलीसारखा पाठलाग करतात व रेतीमाफियांना पथक कुठे आहे, काय करीत आहे, इत्यादी माहिती देतात. त्यामुळे रेतीमाफिया स्वत:ला सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत.
आरटीओमधील भ्रष्टाचार नेहमीच चर्चेचा विषय असतो. दीड वर्षापूर्वी केवळ तीन वर्षे सेवा झालेल्या उपनिरीक्षकाकडे दीड कोटी रुपयाची अपसंपदा आढळून आली होती. त्यानंतरही अनेक आरटीओ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारासाठी कारवाई करण्यात आली. आठ महिन्यापूर्वी ओव्हरलोड वाहनांकडून लाच वसुलीसाठी आरटीओ अधिकाऱ्यांचे दोन गट तयार झाले होते. एका गटाने दुसऱ्या गटाविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ते प्रकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचले होते. परंतु, ओव्हरलोड वाहतूक थांबली नाही. यासंदर्भात काही पीडित नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली होती. गडकरी यांनी २२ ऑक्टोबर रोजी मुख्य सचिव संजीवकुमार यांना पत्र लिहून आरटीओमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास सांगितले होते. दरम्यान, शहर पोलिसांनी रेतीमाफियांवर कारवाई मोहीम राबवून खळबळ उडवून दिली. त्यामुळे रेतीमाफिया ग्रामीण व अन्य भागाकडे वळले.
सूत्रांच्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी परिवहन सचिव अविनाश ढाकणे भ्रष्टाचाराची माहिती घेण्यासाठी नागपुरात आले होते. त्यांच्या आदेशामुळे परिस्थिती बदलली नाही. परिणामी, दक्षता पथकाला पाठविण्यात आले. परंतु, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या पथकाच्या आगमनाची माहिती फोडून रेतीमाफियांना सतर्क केले. रेतीमाफियांनी लगेच रणनीतीमध्ये बदल केला. यासंदर्भात पथकाचे प्रमुख अविनाश सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
------------------
नायक झाला खलनायक
ओव्हरलोड वाहतुकीचा नायक सत्य पुढे आणण्यासाठी प्रयत्नरत व्यक्तींमध्ये खलनायक झाला आहे. संबंधित नायकाला तीन वर्षापूर्वी अमरावती एसीबीने लाखो रुपयासह पकडले होते. तो नांदेडमधील अधिकाऱ्याच्या मदतीने ओव्हरलोडचे रॅकेट संचालित करीत होता. आधी हे काम करणाऱ्या अधिकाऱ्याने व्हीआरएस घेतली आहे.