३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेले ते विद्यार्थीही अकरावी प्रवेशास पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:12 IST2021-09-08T04:12:34+5:302021-09-08T04:12:34+5:30
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्के गुणांचा निकष निर्धारित केला ...

३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेले ते विद्यार्थीही अकरावी प्रवेशास पात्र
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्के गुणांचा निकष निर्धारित केला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण नाहीत म्हणून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गतच्या इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी दिला.
यासंदर्भात जतीन घाेटेकर या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती. जतीनने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई अंतर्गत पूर्ण केले आहे. त्याला इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात ३३ टक्के गुण आहेत. सीबीएसईच्या निकषानुसार तो या विषयात उत्तीर्ण झाला आहे. दहावीनंतर त्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गतच्या इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. संबंधित महाविद्यालयाने त्याला प्रवेशही दिला. पुढे त्याने इयत्ता अकरावीची परीक्षा उत्तीर्ण करून इयत्ता बारावीची परीक्षा दिली. दरम्यान, राज्य मंडळाला जतीनने इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात ३५ टक्के गुण मिळविले नसल्याचे लक्षात आल्यामुळे त्याचा अकरावीतील प्रवेश अवैध ठरवण्यात आला. पात्र नसताना जतीनला अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात आला असे कारण मंडळाने दिले. त्यामुळे जतीनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने कायदेशीर बाबी लक्षात घेता जतीनला इयत्ता अकरावीत प्रवेश मिळण्यासाठी पात्र ठरवले, तसेच राज्य मंडळाचा विवादित निर्णय रद्द केला. याशिवाय, जतीनचा इयत्ता बारावीचा निकाल सात दिवसात जाहीर करा, असा आदेश मंडळाला दिला. जतीनच्यावतीने ॲड. अनिल ढवस यांनी कामकाज पाहिले.