सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच, पोलीसांच्या अमाणूष मारहाणीतच मृत्यू; रामदास आठवलेंचा आरोप

By आनंद डेकाटे | Updated: January 5, 2025 14:27 IST2025-01-05T14:27:01+5:302025-01-05T14:27:12+5:30

केंद्रीय राज्यमंत्री आठवले रविवारी नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. रामदास आठवलेंची दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी

Somnath Suryavanshi was murdered, he died due to inhuman beating by the police; Ramdas Athawale alleges | सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच, पोलीसांच्या अमाणूष मारहाणीतच मृत्यू; रामदास आठवलेंचा आरोप

सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच, पोलीसांच्या अमाणूष मारहाणीतच मृत्यू; रामदास आठवलेंचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परभणी येथील आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी केलेल्या अमाणूष मारहाणीमुळेच मृत्यू झाला असून त्यांची हत्याच झाली आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट करीत संविधानाच्या सन्मानासाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर अशा अमाणूष पद्धतीने मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले रविवारी नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांना कुठलाही आजार नव्हता. पोलिसांच्या बेछुट मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना आजार असल्याचा बनाव पोलीस करीत आहेत. संविधानाचा अपमान अपमान म्हणजे देशाचा अपमान होय. त्यामुळे जेव्हा संविधानाचा अपमान झाला तर साहजिकच त्या विरोधात उद्रेक होणारच.
सर्व पक्षांनी याविराेधात आंदोलन करायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. संविधानाच्या सन्मानासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस अशा प्रकारे मारहाण करीत असतील तर त्या पोलीसांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणातील आरोपी काही माथेफिरू नव्हता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.या प्रकरणाची विशेष चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच बीड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. पत्रपरिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते गौतम सोनवणे, विजय आगलावे, राजन वाघमारे, बाळू घरडे,विनोद थूल आदी उपस्थित होते.

‘एक देश एक इलेक्शन’ संविधानातच तरतूद
‘एक देश एक इलेक्शन’ याची संविधानातच तरतूद आहे. सुरुवातीच्या काही निवडणुका तशाच पद्धतीने झाल्या. परंतु नंतर सत्ताधारी पक्षाचा पाठींबा काढण्याच्या घटनेनंतर ही पद्धत विस्कळीत झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या या बिलाला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठींबा असल्याचे आठवले यांनी एका प्रश्नाच्या स्पष्ट केले.

...तर मनपा, जि.प.च्या निवडणुका स्वबळावर लढणार
रामदास आठवले म्हणाले, रिपाइंसाठी राज्यात एक मंत्रीपद व एमएलसीची मागणी आम्ही केली होती. परंतु ती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये आम्हाला काही जागा मिळाव्या, तसे झाले नाही तर रिपाइं मनपा, जि.प.च्या निवडणुका स्वबळावर लढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Somnath Suryavanshi was murdered, he died due to inhuman beating by the police; Ramdas Athawale alleges