शिवसेना व राष्ट्रवादीच्या हाती चावी
By Admin | Updated: November 26, 2015 03:18 IST2015-11-26T03:18:34+5:302015-11-26T03:18:34+5:30
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आठ जागांसाठी २७ डिसेंबरला निवडणूक होत आहे.

शिवसेना व राष्ट्रवादीच्या हाती चावी
हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा : स्थानिक पातळीवर शिवसेनेत खदखद
नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आठ जागांसाठी २७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. नागपुरातही या निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या निवडणुकीत भाजप- शिवसेना तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीची युती असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक नेते हायकमांडच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. संख्याबळ पाहता भाजपची चाबी शिवसेनेच्या तर काँग्रेसची चाबी राष्ट्रवादीच्या हाती आहे. शिवसेना व राष्ट्रवादी युतीधर्माचे कितपत पालन करतात यावर नागपूरचा निकाल अवलंबून आहे.
राज्यभरातील आठ जागांसाठी निवडणूक असल्यामुळे युती किंवा आघाडीबाबत प्रदेश स्तरावरच निर्णय घेतला जाणार आहे. असे असले तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेत भाजपबाबत खदखद आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ऐनवेळी भाजप- सेनेची युती तुटली होती. निकालानंतरही भाजपने राष्ट्रवादीशी घरोबा केला. अध्यक्षपद स्वत:कडे तर उपाध्यपद राष्ट्रवादीला सोपविले. अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीने साथ सोडल्याने भाजपने जि.प.मध्ये सेनेला सोबत घेतले व उपाध्यक्षपद दिले. महापालिकेच्या निवडणुकीतही जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नव्हता. शेवटी १८ जागांवर युती व काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपने राजकीय खेळी खेळत शिवसेनेला बाहेर ठेवत आघाडीची नोंदणी केली आणि शिवसेनेला उपमहापौरपद देण्याची परंपराही मोडीत काढली. भाजपने उपमहापौरही स्वत: कडेच ठेवले. अडीच वर्षांनी अपक्षाला उपमहापौरपद दिले पण शिवसेनेला संधी दिली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप- सेनेची युती होती. तेव्हा दोन्ही पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते काहीसे एकत्र आले. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेची कोंडी झाली. शिवसेनेचे एकमेव आमदार आशीष जैस्वाल यांना पराभवाला सामोरे जावे लागले व जिल्ह्यात शिवसेनेचे ‘अकाऊंट क्लोज’ झाले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नागपूर महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीत भाजपशी युती व्हावी, अशी शिवसेनेची ईच्छा होती. मात्र, भाजप नेत्यांनी अपेक्षित जागा देण्यास नकार देत ताणून धरले. शेवटी युती झाली नाही. सेनेला फटका बसला. ही सर्व खदखद शिवसेना नेते व कार्यकर्त्यांच्या मनात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी नागपूरची माहिती मागविली आहे. शिवसेनेकडे ६२ मतदार आहेत. भाजपचे गणित बिघडवायला एवढी संख्या पुरेशी आहे. मात्र, नागपूरसह राज्यभरातील स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी जवळपास पक्की मानली जात आहे. काँग्रेसकडून अनंतराव घारड उमेदवार असताना राष्ट्रवादीने घात केला, असा काँग्रेसकडून पडद्यामागे आरोप केला जातो. मात्र, गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांना राष्ट्रवादीने साथही दिली होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळी लढली. याचा नागपूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा फटका बसला याची सल साष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री व विधानसभेचे उमेदवार हे सर्व किती सहजपणे विसरतात यावरही काँग्रेसचे बरेच काही अवलंबून आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना यावेळीही आघाडी अपेक्षित आहे. रीतसर घोषणा होईपर्यंत काही बोलणे योग्य होणार नाही, असे पक्षातर्फे नागपूरकरिता उमेदवार निवडीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख आ. विजय वडेट्टीवार यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. आघाडीबाबत दोन दिवसात मुंबईत निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली होती. या वेळीही राष्ट्रवादीची साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)