शिवचरित्र ऐकण्याचा नव्हे प्रेरणेचा विषय
By Admin | Updated: June 11, 2014 01:24 IST2014-06-11T01:24:35+5:302014-06-11T01:24:35+5:30
हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कष्ट घेतले नसते आणि खस्ता खाल्या नसत्या तर आज आपण यवनांच्या राज्यात पापस्थानात राहिलो असतो.

शिवचरित्र ऐकण्याचा नव्हे प्रेरणेचा विषय
ज्ञानेश्वर पुरंदरे : शिवराज्याभिषेक सोहळा समितीचा उपक्रम
नागपूर : हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कष्ट घेतले नसते आणि खस्ता खाल्या नसत्या तर आज आपण यवनांच्या राज्यात पापस्थानात राहिलो असतो.
शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्य स्थापन करून आपल्या संस्कृतीचे आणि धर्माचे रक्षण केले. शिवाजींच्या चरित्रापासून आपण प्रेरणा घेऊन शक्य ते कार्य आपल्या राष्ट्रासाठी केले पाहिजे. शिवचरित्र हा ऐकण्याचा नव्हे तर प्रेरणा घेण्याचा विषय आहे, तो अनुकरणाचाही विषय आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र अभ्यासक ज्ञानेश्वर पुरंदरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी वक्ता म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख आणि प्रमुख अतिथी म्हणून राजे मुधोजी भोसले, संयोजक दत्ता शिर्के उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, शिवराज्याभिषेकाचा दिन हा अभिमानाचा दिवस आहे. शिवाजींच्या चरित्रात क्रांतीची प्रेरणा आहे. जिजाऊ विवाहानंतर सासरी निघाल्या तेव्हा त्यांना दर्शनासाठी मंदिर मिळाले नाही. यवनांच्या क्रौर्याने सारी जनता भयभीत होती. या प्रकाराने त्या व्यथीत आणि संतप्त झाल्या. बादशहासाठी शहाजीराजांनी पराक्रम गाजविल्यावर जिजाऊंच्या मनात त्यांच्याबाबत अभिमान नव्हता. कारण त्यांचे पराक्रम बादशहासाठी होते. बंगळुरूला सुखात असताना शिवबाला घेऊन जिजाऊ पुण्याला निघाल्या कारण त्यांना महाराष्ट्राचा इतिहास बदलवायचा होता. शिवबांच्या हातून संघटन उभारायचे होते. राज्यातल्या जनतेचे दु:ख त्यांना शिवाजींच्या मनात ठसवायचे होते. लहानग्या शिवाजींना घेऊन त्या प्रार्थना म्हणायच्या आणि रामायण, महाभारताच्या कथा सांगून त्यांच्यात पौरुषत्व निर्माण करायच्या. जिजाऊंच्या संस्कारातूनच शिवबा घडले आणि त्यांच्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत. प्रत्येक मातेने शिवबांसारखा संस्कार आपल्या मुलांवर केला तर राष्ट्राची सर्व संकटे संपतील. पण आपण शिवरायांचे अनुकरण करण्यात कमी पडतो. आपल्या सुखांसाठीच आपण झटतो. राष्ट्राला उंचावर नेण्यासाठी शिवाजींचे चरित्र आपण जगण्यात आणायचा संकलल्प केला पाहिजे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप दिवटे यांनी तर संचालन श्याम तांबोळी यांनी मानले. आभार पंकज पराते यांनी मानले. शिवस्तुती अजय देवगावकर यांनी सादर केली. याप्रसंगी तुतारीच्या निनादात प्रभाकरराव भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शिवबांच्या नावांच्या घोषणांनी शिवशाही अवतरल्याचा भास होता. शिवाजींच्या पुतळ्याला मालार्पण करून कार्यक्रमस्थळी पालखी आणली गेली. (प्रतिनिधी)