सात लाख विद्यार्थ्यांना मिळणार आम आदमी विमा योजनेचा लाभ
By Admin | Updated: June 19, 2014 00:55 IST2014-06-19T00:55:17+5:302014-06-19T00:55:17+5:30
राज्यातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांकरिता यंदा प्रभावीपणे आमआदमी विमा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे.

सात लाख विद्यार्थ्यांना मिळणार आम आदमी विमा योजनेचा लाभ
पहिल्या दिवशीच निवड : विद्यार्थी वंचित राहिल्यास शाळा व्यवस्थापनावर कारवाई
मोहन राऊत - अमरावती
राज्यातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांकरिता यंदा प्रभावीपणे आमआदमी विमा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून सात लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे़
ज्या शाळांमधील विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहील त्या शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे. आमआदमी विमा योजना ही केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त पुढाकाराने राबविली जाते़ केंद्र शासनाच्या निकषानुसार ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो़ या निकषांमध्ये राज्य शासनाने गतवेळी बदल करून अडीच एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना योजनेसाठी पात्र ठरविले आहे. योजनेंतर्गत प्रती लाभार्थी वार्षिक दोनशे रूपये विमा हप्त्यापैकी शंभर रूपये केंद्र शासन तर शंभर रूपये राज्य शासन भरणार आहे.
योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रूपये, नैसर्गिक मृत्यू आल्यास ३० हजार रूपये, एक हात किंवा एका पायाला अपंगत्व आल्यास ३७ हजार ५०० रूपये, दोन्ही हात किंवा पायांना अपंगत्व आल्यास ७५ हजार रूपये विम्याचा लाभ मिळतो. याशिवाय दोन अपत्ये असलेल्या लाभार्थ्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना आम आदमी विमा शिष्यवृत्ती योजनेचा थेट लाभ मिळणार आहे़ या विद्यार्थ्यांना शंभर रूपये दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येईल. इतर शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल़