कृष्णधवल गीतांच्या सिनेगीतांनी रंगली सांज
By Admin | Updated: June 15, 2014 00:35 IST2014-06-15T00:35:59+5:302014-06-15T00:35:59+5:30
आपले अवघे जीवन संगीतमय करणारे काही मोजके कलावंत कायम रसिकांना प्रिय असतात. कृष्णधवल चित्रपटांचा काळ हा सुवर्णयुग मानला जातो. त्या काळातील दिग्गज गायक के. एस. सैगल, नूरजहाँ, लता,

कृष्णधवल गीतांच्या सिनेगीतांनी रंगली सांज
नागपूर : आपले अवघे जीवन संगीतमय करणारे काही मोजके कलावंत कायम रसिकांना प्रिय असतात. कृष्णधवल चित्रपटांचा काळ हा सुवर्णयुग मानला जातो. त्या काळातील दिग्गज गायक के. एस. सैगल, नूरजहाँ, लता, आशा, गीता दत्त, मन्नाडे, मुकेश, किशोरकुमार आदींच्या मूळ स्वरातील अमिट सिनेगीतांच्या कार्यक्रमाने आज रसिकांना जिंकले. आविष्कार संगीत अकादमी आणि स्पर्श संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. दृकश्राव्य माध्यमात सादर झालेला हा कार्यक्रम उपस्थितांना आनंदाचा ठेवा होता.
आविष्कारचे संचालक अनिरुद्ध जोशी, रसिका चाटी-जोशी, अवंतिका बोपोरीकर, अवंती पाध्ये यांनी तयारीने सादर केलेल्या भावपूर्ण अनुभूतीच्या नितांत श्रवणीय गीतांमुळे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रसिकांना स्वरानंदाचा अनुभव घेता आला. अनिरुद्ध आणि रसिका यांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताला यावेळी रसिकांचा प्रतिसाद लाभला. संजय दमाणी व डॉ. सुधीर कुन्नावार यांनीही यावेळी काही गीते सादर करून रसिकांची दाद घेतली.
अवंतिकाने ‘आजा रे परदेसी...’ आणि अवंतीने ‘जुलमी संग आख लडी...’ या गीतांनी माहोल केला. अनिरुद्धने मूळ सैगल यांच्या स्वरातील ‘हम जी के क्या करेंगे जब दिल ही टूट गया...’ या भावपूर्ण गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतर ‘पुछो ना कैसे मैने रैन बितायी...’ अवंतिकासह ‘ये रात भिगी भिगी...’ तर रसिकासोबत ‘मेरे पिया गये रंगून...’ आदी गीतांनी या कार्यक्रमात रंगत वाढविली.
रसिकाने ‘आवाज दे कहाँ है..., जवाँ है मोहोब्बत...’ ही गीते तबीयतीने सादर केली. संजय दमाणी व रसिका यांनी ‘आजा सनम मधुर चाँदनी मे हम...’, सुधीर कुन्नावार व रसिका यांच्या स्वरात ‘दिल ए नादान तुझे हुआ क्या है...’ सादर करण्यात आले.
याशिवाय ‘ले के पहला पहला प्यार..., बेकरार करके हमे .., प्यार किया तो डरना क्या.., कुहू कुहू बोले कोयलिया...’ आदी गीतांनी कार्यक्रम उंचावर गेला. मुकुंद देशपांडे आणि श्वेता शेलगावकर यांचे निवेदन होते. अशोक टोकलवार, रिंकु निखारे, सुभाष वानखेडे, महेंद्र ढोले, अक्षय आचार्य, पंकज यादव यांनी वाद्यसंगत केली.
राजेश अमीन यांची आकर्षक सजावट होती. स्टेट बँक आॅफ इंडियाचे उच्च पदाधिकारी फणसे, विजय दमानी, नाईक उपलंचीवार यांनी उद्घाटन केले. (प्रतिनिधी)