आगीच्या घटना रोखण्यासाठी ‘आरपीएफ’चे अभियान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:45+5:302021-03-26T04:09:45+5:30
नागपूर : रेल्वेगाड्यात तसेच रेल्वेस्थानक परिसरात आग लागल्यामुळे जीवितहानी होऊन, रेल्वे संपत्तीचे नुकसान होते. या आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे ...

आगीच्या घटना रोखण्यासाठी ‘आरपीएफ’चे अभियान ()
नागपूर : रेल्वेगाड्यात तसेच रेल्वेस्थानक परिसरात आग लागल्यामुळे जीवितहानी होऊन, रेल्वे संपत्तीचे नुकसान होते. या आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने अभियान सुरू केले असून पेंट्रीकार, रेल्वेस्थानकावर जनजागृती करण्यात येत आहे.
दक्षिण पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्या आणि रेल्वेस्थानकावर घडणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी विभागीय सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सुरू केले आहे. अभियानात इतवारी, कळमना आणि कामठी रेल्वेस्थानकाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रेल्वेगाड्यात आगीच्या घटना रोखण्यासाठी १८ मार्च ते २ एप्रिल दरम्यान १५ दिवसांचे अभियान सुरू केले आहे. त्यानुसार रेल्वेगाड्यात आग विझविण्यासाठी असलेल्या अग्निशमन यंत्राचा वापर कसा करावा, पेंट्रीकारमध्ये विजेच्या तारा खुल्या आहेत की काय याची तपासणी करण्यात येत आहे. यासोबतच शौचालयात असलेल्या टिश्यू पेपरच्या ठिकाणी छिद्र तर नाही हे पाहण्यात आले. रेल्वेस्थानकावर सफाई कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आग लागल्यास ती कशी विझवावी याची माहिती देण्यात येत आहे. प्रवाशांनाही ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून आग कशी विझवावी हे सांगण्यात येत आहे. यात आरपीएफ ठाणे कामठीचे प्रभारी मोहम्मद मुगीसुद्दीन, प्रधान आरक्षक डुमकुंडवार, ईशांत दीक्षित यांचा चमू अभियानासाठी परिश्रम घेत आहे.