भूजल स्तर वाढवण्यासाठी पावसाच्या पाण्याचा वापर व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST2021-02-06T04:11:08+5:302021-02-06T04:11:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील पावसाळी नाल्या बुजल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. या पाण्याचा वापर भूजल ...

भूजल स्तर वाढवण्यासाठी पावसाच्या पाण्याचा वापर व्हावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील पावसाळी नाल्या बुजल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. या पाण्याचा वापर भूजल स्तर वाढवण्यात करता येईल का? याचा विचार करायला हवा. जर हे शक्य असेल तर तसा प्रस्ताव तयार करून पावसाळ्यापूर्वी यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
यासंदर्भात मनपा मुख्यालयाच्या डाॅ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, दिव्या धुरडे, वरिष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, राजेश भुतकर, अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, धनराज मेंढुलकर, अनिल गेडाम, गुरुबक्शानी आदी उपस्थित होते.
महापौर तिवारी म्हणाले, सेंट्रल एव्हेन्यूवर जे महत्त्वपूर्ण पार्किंग स्थळ आहे. तिथे रेन वाॅटर हार्वेस्टिंग करून रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्याला डायव्हर्ट करून तेथील भूजल स्तर वाढवण्याबाबतचा प्रयत्न करायला हवा. शहरातील उद्यानांबाहेरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहते. त्या ठिकाणीही या पद्धतीचा विचार करता येऊ शकते. जेणेकरून परिसरातील बोअरवेल, विहिरी आदींमधील भूजलाचा स्तर वाढू शकेल आणि तिथे वर्षभर पाणी उपलब्ध राहील. या विषयावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. पावसाळा लागण्यापूर्वी हे प्रयोग करावेत, असे निर्देश महापौरांनी दिले.
.
बाॅक्स..
ड्रेनेज विभागाचे पुनर्गठण आवश्यक
महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, शहरातील अनेक ठिकाणी नाल्या चोक होतात. काही ठिकाणी मनुष्यबळाच्या साहाय्याने तर काही ठिकाणी मशीनद्वारे चेंबर क्लियर केले जातात. परंतु बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग (स्वच्छता) यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने अनेकदा चेंबर साफ करण्यास अडचणी येतात. त्यामुळे ड्रेनेज विभागाचे पुनर्गठण होणे आवश्यक आहे.