माथेफिरू विक्की नगराळेला फासावर लटकवू : अॅड. प्रशांत सत्यनाथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 00:38 IST2020-02-07T00:35:44+5:302020-02-07T00:38:01+5:30
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या माथेफिरू विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फासावर लटकवले हेच आपले अंतिम लक्ष्य राहील, अशी भूमिका अॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.

माथेफिरू विक्की नगराळेला फासावर लटकवू : अॅड. प्रशांत सत्यनाथन
राकेश घानोडे/ लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या माथेफिरू विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फासावर लटकवले जावे, ही समाजाची मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने खटला लढवेन. नगराळेला फाशीची शिक्षा मिळवून देणे हेच आपले अंतिम लक्ष्य राहील, अशी भूमिका अॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.
अॅड. सत्यनाथन नागपुरातील ख्यातनाम फौजदारी कायदेतज्ज्ञ असून या प्रकरणात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. वर्धा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी गुरुवारी अॅड. सत्यनाथन यांची याकरिता सहमती घेतली. अॅड. सत्यनाथन यांनी ही माहिती खरी असल्याचे सांगितले व आपले लक्ष्यही स्पष्ट केले. ही अत्यंत दुर्दैवी व अमानुष घटना आहे. या घटनेमुळे समाजमन हादरले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. देशात अशाच घटनांवरून तीव्र असंतोष उफाळला असताना आरोपीने हे क्रूर कृत्य केले. भविष्यात अशा घटनांना आळा बसणे आवश्यक आहे. त्याकरिता नगराळेला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता पूर्ण प्रयत्न करणार आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी पीडित प्राध्यापिकेचे बयान, प्रत्यक्षदर्शींचे बयान व परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरतील, असे अॅड. सत्यनाथन यांनी पुढे बोलताना सांगितले. अॅड. सत्यनाथन यांचा जन्म नागपुरातील असून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण वर्धा येथे झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९८१ मध्ये एलएल. बी. पदवी उत्तीर्ण केली. तेव्हापासून ते वकिली करीत आहेत.
दीर्घ अनुभव असलेले कायदेतज्ज्ञ
नगराळेला फाशीची शिक्षा होण्यासाठी फौजदारी कायदेतज्ज्ञ वकिलाची नियुक्ती करण्याची समाजाची मागणी होती. त्यानुसार सरकारने अॅड. सत्यनाथन यांचे नाव अंतिम केले आहे. त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून फौजदारी खटले लढण्याचा दीर्घ अनुभव आहे. ते नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात १९९३ ते १९९६ व २००० ते २००८ या कलावधीत मुख्य जिल्हा सरकारी वकील होते. यापूर्वी त्यांनी माओवादी साईबाबा, संतोष आंबेकर, हरीश्चंद्र धावडे यासह अनेक कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध यशस्वीपणे खटले लढले आहेत.