भाज्यांचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 03:01 IST2016-04-09T03:01:04+5:302016-04-09T03:01:04+5:30
वाढत्या उन्हामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. खुल्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

भाज्यांचे भाव कडाडले
महिन्यात दुपटीने वाढ : स्थानिक उत्पादकांकडून आवक कमी
नागपूर : वाढत्या उन्हामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. खुल्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
लग्नसराईत भाज्यांची मागणी वाढली आहे. महिन्यात भाज्यांची दुपटीने दरवाढ झाली आहे. दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले की, सध्या बाजारात दररोज १०० ते १२५ टेम्पो माल येत आहे. अन्य राज्यातूनही आवक फारच कमी आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. गेल्यावर्षी या काळात दर स्थिर होते. यावर्षी हवामानामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट झाली. (प्रतिनिधी)
किरकोळमध्ये महागच
नागपूरपासून ३० कि.मी.च्या भागात ओलिसाचे क्षेत्र होते. पण या जागांवर सध्या बिल्डर्सचा ताबा असल्यामुळे ओलिताच्या जमिनी ओसाड पडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून उत्पादनात बरीच घट झाली आहे. उन्हाळ्यात लगतच्या उत्पादकांकडून आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात वांगे, पत्ता कोबी, फूल कोबी, टमाटर, कोथिंबीर, चवळी, पालक, मूळा आदींचे दर परवडणारे आहेत. नेहमीच्या भाज्या १५ ते ३० रुपयांदरम्यान आहेत. संगमनेर, मदनपल्ली, नाशिक येथून टमाटर, टाटानगर येथून सिमला मिरची, छिंदवाडा येथून फूलकोबी तसेच लगतच्या जिल्ह्यातून भाज्यांची आवक आहे. यापुढे ग्राहकांना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील, असे महाजन यांनी सांगितले.
बटाटे, कांदे स्वस्तच
यावर्षी उत्पादन वाढल्याने मार्च महिन्यात आलू स्वस्त तर कांदे सामान्यांच्या आटोक्यात आहे. जानेवारीनंतर बाजारात येणाऱ्या कांद्याची साठवणूक करता येत नाही. कळमना बाजारात पांढरा आणि लाल कांदा प्रति किलो ८ ते १० रुपयादरम्यान आहे. किरकोळमध्ये १५ रुपयांनी विक्री सुरू आहे. दररोज २० ते २५ गाड्यांची आवक आहे. सध्या चाळीसगाव, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील माल येत आहे. अकोला व अमरावती येथील चांगला माल एप्रिलमध्ये बाजारात येईल. सध्या पावसामुळे नुकसान झाले असून भाव वाढू शकतात, असे मत कळमना येथील आलू-कांदा अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षी बटाट्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने भावात घसरण झाली आहे. अलाहाबाद, कानपूर, आग्रा येथून दररोज १६ टन क्षमतेच्या २५ ते ३० ट्रकची आवक सुरू आहे. कळमन्यात भाव ८ ते १० रूपये किलो तर किरकोळमध्ये भाव १५ रुपयांवर आहेत. आवक वाढल्याने भाववाढीची शक्यता नसल्याचे वसानी म्हणाले.