उपराजधानीत गँगवॉर भडकले
By Admin | Updated: June 22, 2014 01:07 IST2014-06-22T01:07:13+5:302014-06-22T01:07:13+5:30
उपराजधानीत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील शत्रुत्वाचा भडका उडाल्याने अवघ्या २० तासात चार गुन्हेगारांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी संपविले. यामुळे गुन्हेगारी जगतातील बेदरकारी प्रकर्षाने समोर आली

उपराजधानीत गँगवॉर भडकले
२० तासात चार खून : नंदनवनमध्ये गुन्हेगाराच्या टोळीने प्रतिस्पर्ध्यांना चिरडले, तीन ठार
नागपूर : उपराजधानीत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील शत्रुत्वाचा भडका उडाल्याने अवघ्या २० तासात चार गुन्हेगारांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी संपविले. यामुळे गुन्हेगारी जगतातील बेदरकारी प्रकर्षाने समोर आली असून सर्वसामान्यांमध्ये मात्र प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. नंदनवनमध्ये शुक्रवारी रात्री राहुल चेपट्याच्या टोळीतील तिघांचा खून झाला. तर शनिवारी रात्री कळमन्यातील कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ युवराज रहांगंडाले याचाही खून झाला़ हसनबागमध्ये समशेर टोळीने प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांच्या खूनाचा प्रयत्न केला. या खून सत्रामुळे पोलिसांचेही धाबे दणाणले आहे.
शहरातील दोन कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील वैमनस्याचा शुक्रवारी रात्री भडका उडाला. एका टोळीतील गुन्हेगारांनी दुसऱ्या टोळीतील चार जणांवर स्कॉर्पिओ घालून चिरडले. यामुळे तिघांचा मृत्यू झाला. तर, एक गंभीर जखमी झाला. दरम्यान, प्रतिस्पर्ध्यांना ठार मारण्याच्या प्रयत्नात आरोपींची स्कॉर्पिओसुध्दा ट्रकवर आदळल्याने दोन आरोपी गंभीर जखमी झाले. नंदनवन पोलीसांच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली.
मृताचे नाव रशिदखान नसिमखान ऊर्फ भाईजान आणि अब्दुल अशी आहेत. हे तसेच प्रदीप भारत घोडे आणि रोहित नारनवरे हे चौघे राहुल (चेपट्या) मेश्रामच्या टोळीतील गुंड होत. कब्जा आणि खंडणी वसुलीच्या निमित्ताने दीड-दोन वर्षांपूर्वी राहुल चेपट्या आणि जगदीश कोसूरकर, दिलीप कोसूरकर या गुंडांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. वर्चस्वासाठी परस्परावर हल्ले करणे, एकमेकांच्या कामात अडथळे आणणे, यामुळे त्यांच्यातील वैमनस्य तीव्र झाले होते. अशात पोलिसांनी राहुलला एमपीडीए अंतर्गत कारागृहात डांबले. त्यामुळे त्याच्या टोळीतील सदस्य हतबल झाले आणि कोसूरकर बंधू या टोळीवर पूर्णत: हावी झाले होते. दीड महिन्यापूर्वी राहुल कारागृहात बाहेर आला. तेव्हापासून त्याने आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी पुन्हा कोसूरकर टोळीशी कुरापती सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर, सक्करदऱ्यातील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंटमध्ये शुक्रवारी रात्री एका भाईचे लग्न होते. तेथे नागपूरच्या गुन्हेगारी जगतातील अनेकांनी हजेरी लावली. कोसूरकर आणि भाईजानसुध्दा आपापल्या मित्रांसह तेथे आला होता.
कळमन्यात कुख्यात बाल्या रहांगडालेचा खून
गुलशननगर कळमन्यात प्रचंड दहशत निर्माण करणारा कुख्यात बाल्या ऊर्फ युवराज रहांगडाले याचा एका तरुणाने भीषण खून केला. बाल्यावर खून, खुनाचे प्रयत्न आणि लुटमारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आज रात्री ९ च्या सुमारास योगेंद्र मंगल पाल याच्या घरावर तो एका साथीदारासह चालून गेला. यावेळी घरात महिला होत्या. त्याच्या हातात हत्तीमार चाकू होता. त्याने पाल परिवाराला शिवीगाळ केली. त्यामुळे घरातील महिलांनी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यामुळे तो आणि त्याचा साथीदार पळू लागला. तेवढ्यात योगेंद्र पाल आला. त्याने बाल्याच्या हातातील हत्तीमार चाकू हिसकावून त्याच्या गळ्यावर, तोंडावर सपासप घाव घातले. बाल्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर पाल कळमना ठाण्यात पोहचला.