पोलिसांच्या खबऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: September 2, 2016 02:54 IST2016-09-02T02:54:50+5:302016-09-02T02:54:50+5:30
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून गुन्हेगारांनी हल्ला चढवल्याने गंभीर जखमी झालेल्या शेख अकबर शेख मेहबूब (३८) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांच्या खबऱ्याचा मृत्यू
प्राणघातक हल्ल्यात झाला होता जखमी : खुनाचा गुन्हा दाखल
नागपूर : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून गुन्हेगारांनी हल्ला चढवल्याने गंभीर जखमी झालेल्या शेख अकबर शेख मेहबूब (३८) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परिणामी पोलिसांनी आता या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सय्यद शफीक सय्यद रफिक ऊर्फ मुन्ना तीन पत्ती आणि पवन सुंदरलाल गौर याला अटक केली आहे. राजा उर्फ ताहिर शेख नावाचा तिसरा आरोपी फरार आहे. राजाचे संत्रा मार्केट येथे हॉटेल असून, आरोपी तेथे अनेक अवैध धंदे चालतात.
मंगळवारी रात्री १०.१५ वाजता संत्रा मार्केटमध्ये १३ नंबर नाक्याजवळ पवन सुंदरलाल गौर, शेख शफिक ऊर्फ मुन्ना तीन पत्ती आणि राजा ऊर्फ ताहिर शेख नामक आरोपीने अकबरवर हल्ला चढवला होता.
आरोपींनी त्याच्या पोटावर, छातीवर सात-आठ वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. आरोपी पळून गेल्यानंतर एका आॅटोचालकाने अकबरला मदतीचा हात देऊन मेयो रुग्णालयात नेले. घटनेची माहिती कळताच गणेशपेठचे ठाणेदार महेश चव्हाण आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. परिमंडळ तीनचे उपायुक्त एम. राजकुमार यांनी ठाण्याला भेट दिली. या प्रकरणाचे प्रत्यक्षदर्शी आणि अकबरच्या नातेवाईकांकडून या घटनेचे कारण जाणून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. दरम्यान, उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अटकेतील आरोपींची कोर्टातून पाच दिवसांची पोलीस कस्टडी मिळवली. फरार राजा ऊर्फ ताहिरचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)
हिस्ट्रीशिटर अन् पोलीस पंटरही
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार अकबर हिस्ट्रीशिटर (अट्टल गुन्हेगार) होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याला हद्दपार करण्यात आले होते. त्याच्यावर एमपीडीए अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. अलीकडे अकबरने गुन्हेगारीपासून स्वत:ला दूर केले होते. गुन्हेगार तसेच अवैध धंदेवाल्यांच्या टीप देऊन तो काही पोलिसांच्या जवळ गेला होता. महत्त्वाच्या बातम्या देऊन काही पोलिसांना त्याने खूश केले होते तर, अनेक गुन्हेगार आणि अवैध धंदेवाले तसेच काही पोलीस त्याच्यापासून दुखावले होते. त्यामुळेच त्याचा खून झाल्याची चर्चा आहे.