वैशालीनगरात असामाजिक तत्त्वाची दहशत
By Admin | Updated: May 5, 2016 03:06 IST2016-05-05T03:06:21+5:302016-05-05T03:06:21+5:30
वैशालीनगर येथील रस्त्यावरील चायनीज ठेले हे असामाजिक तत्त्वांचे अड्डे बनले आहेत. आपली दहशत निर्माण करण्यासाठी ते कुणालाही मारहाण करीत असतात.

वैशालीनगरात असामाजिक तत्त्वाची दहशत
तरुणाला केले रक्तबंबाळ : तक्रार घेतली नाही
नागपूर : वैशालीनगर येथील रस्त्यावरील चायनीज ठेले हे असामाजिक तत्त्वांचे अड्डे बनले आहेत. आपली दहशत निर्माण करण्यासाठी ते कुणालाही मारहाण करीत असतात. असाच एक प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. दारू पिण्यासाठी आलेल्या एका २८ वर्षीय तरुणाला विनाकारक मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत हा तरुण पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेला तेव्हा त्याची तक्रार दाखल करून न घेता त्याला परत पाठविण्यात आले. त्यामुळे येथील असामाजिक तत्त्वाला पोलिसांचा आशीर्वाद असल्याची परिसरात चर्चा आहे.
राजेश महादेव निमजे रा. नाईकवाडी बांगलादेश असे पीडित तरुणाचे नाव आहे. तो मार्केटिंगचे काम करतो. वैशालीनगर सुशील वाईन शॉपसमोर चायनीजसह अनेक ठेले लागतात. येथे फुटपाथवरच सर्रास दारू पिली जाते. पोलिसांनही याची माहिती आहे. परंतु हा परिसर असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला आहे. सायंकाळ होताच येथून नागरिक विशेषत: महिला जाण्यास घाबरतात, असे येथील चित्र असते. (प्रतिनिधी)
राजेश नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता येथे दारू पिण्यासाठी आला होता. तेव्हा पाच ते सहा जणांनी कुठलेही कारण नसतांना त्याला मारहाण केली. तो रक्तबंबाळ होतपर्यंत त्याला मारले. कारण नसतांना मारहाण झाल्यामुळे राजेश याची तक्रार करण्यासाठी पाचपावली पोलीस ठाण्यात गेला. परंतु पोलीस त्याचे काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते. उलट त्यालाच समजावत घरी जाण्यास सांगितले. यामुळे संतापलेल्या राजेशने लोकमतला आपली आपबिती सांगितली.
——————————————-