भाजप विरोधात शिवसेनेत खदखद
By Admin | Updated: August 13, 2016 02:07 IST2016-08-13T02:07:47+5:302016-08-13T02:07:47+5:30
भाजपकडून सातत्याने अन्याय होत आहे. वेळोवेळी डावलले जात आहे. महापालिकेत शिवसेनेची कामे होत नाही.

भाजप विरोधात शिवसेनेत खदखद
संपर्क प्रमुख परब यांच्याकडे मांडल्या व्यथा : लढण्यासाठी ताकद द्या
नागपूर : भाजपकडून सातत्याने अन्याय होत आहे. वेळोवेळी डावलले जात आहे. महापालिकेत शिवसेनेची कामे होत नाही. स्थानिक भाजप नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्याची कामे होऊ देत नाही, अशी खदखद शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुख आ. अनिल परब यांच्याकडे व्यक्त केली. भाजप शिवसेना संपवायला निघाली आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्याशी युती न करता स्वबळावर लढण्यासाठी आम्हाला ताकद द्या, अशी गळही परब यांना घालण्यात आली.
परब शुक्रवारी नागपुरात आले. सकाळी रविभवनात काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतरर दुपारी नगरसेवक किशोर कुमेरिया, बंडू तळवेकर, अलका दलाल, जगतराम सिन्हा यांनीही परब यांची भेट घेतली. महापालिकेत शिवसेनेला सातत्याने डावलले जात आहे.
शिवसेना नगरेवकांची कामे केली जात नाही. सभागृहात शिवसेना सदस्यांचा कोणताही प्रश्न आला तर त्यांना बोलू दिले जात नाही. उचललेल्या प्रश्नाची दखल घेऊन न्याय दिला जात नाही, अशी तक्रार नगरसेवकांनी परब यांच्याकडे केली. भाजपने महापालिकेत अनेक घोटाळे केले आहेत. येत्या काळात या घोटाळ्यांविरोधात आंदोलन उभारण्यासाठी पक्षातर्फे पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली.
रविभवनात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रमुख सतीश हरडे, नगरसेवक किशोर कुमेरिया, जगतराम सिन्हा, शहर प्रमुख सुरज गोजे, उपशहर प्रमुख किशोर राठोड, वसंता डोंगरे, महिला अध्यक्ष सुरेखा खोब्रागडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी परब यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेतला. महापालिकेच्या निवडणुकीसाठी किती जागा लढविता येतील, किती जागा निवडून येऊ शकतील, किती ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहू शकतील, अशा संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे निर्देशही परब यांनी दिले. चांगले लोक पक्षाशी जोडण्यासाठी पुढाकार घ्या.
१६ आॅगस्टपासून सदस्य नोंदणी मोहीम सुरू होत आहे. त्यात पुढाकार घ्या, अशा सूचनाही दिल्या. निवडणुकीची तयारी करायची आहे. युतीचा विषय हा पक्षश्रेष्ठींचा आहे. पण स्वबळावर लढण्याची वेळ आली तर प्रत्येक वॉर्डात आपली ताकद हवी. त्यासाठी आतापासून कामाला लागा, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)