यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी पुन्हा संधी
By Admin | Updated: June 8, 2014 00:52 IST2014-06-08T00:52:46+5:302014-06-08T00:52:46+5:30
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नसल्याने झालेला गोंधळ दूर करण्याची एक संधी आयोगाने मतदारांना दिली आहे. २१,२२,२८ व २९ जून या दिवशी नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात

यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी पुन्हा संधी
विशेष मोहीम: ९ जूनपासून पुनरिक्षण
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नसल्याने झालेला गोंधळ दूर करण्याची एक संधी आयोगाने मतदारांना दिली आहे. २१,२२,२८ व २९ जून या दिवशी नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असून यात ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांना व इतरांनाही नावे नोंदवता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. यावरून वादंगही माजले होते. प्रकरण न्यायालयातही गेले. न्यायालयाने वगळलेल्या मतदारांची नावे यादीत सामावून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. आगामी विधानसभा निवडणुका असल्याने यादी अद्ययावत करायची होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने १ जानेवारी २0१४ च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार तसेच ९ ते ३0 जून दरम्यान मतदारांना मतदार यादीबाबात दावे आणि हरकती दाखल करता येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी कळविले आहे.
तालुका पातळीवर तहसीलदार कार्यालयात व शहरात महानगर पालिकेच्या झोन कार्यालयात मतदार मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रावर मतदारांना त्यांच्या नावाची नोंदणी करता येईल तसेच आक्षेप व दावेही दाखल करता येतील. अनेक मतदारांकडे आयोगाचे ओळखपत्र आहे. पण त्यांचे नाव यादीत नाही. त्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही. अशा मतदारांनी त्यांचे नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी व नसेल तर प्रपत्र क्रमांक ६ भरून संबंधित झोनमध्ये नावनोंदणी करावी. अर्ज केलेल्या मतदारांनी त्यांचे नाव यादीत आले किंवा नाही याची खात्री आयोगाच्या संकेतस्थळावरील यादी पाहून करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.(प्रतिनिधी)