एक कोटी कुटुंबांच्या छतावर लागणार सोलर यंत्रणा; महाराष्ट्रातील ७ शहरांनाही मिळणार लाभ 

By आनंद डेकाटे | Updated: February 1, 2024 16:57 IST2024-02-01T16:57:38+5:302024-02-01T16:57:54+5:30

अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधानांनी केली होती ‘सूर्योदय योजने'ची घोषणा.

One crore families will have rooftop solar systems 7 cities of Maharashtra will also get benefit | एक कोटी कुटुंबांच्या छतावर लागणार सोलर यंत्रणा; महाराष्ट्रातील ७ शहरांनाही मिळणार लाभ 

एक कोटी कुटुंबांच्या छतावर लागणार सोलर यंत्रणा; महाराष्ट्रातील ७ शहरांनाही मिळणार लाभ 

नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्पात सौर ऊर्जेवर अधिक भर देण्यात आला आहे. यात देशभरात एक कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा बसवून त्यांना वीज बिलातून दिलासा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठा समारंभात यासंदर्भातील प्रधानमंत्री यूर्योदय योजनेची घोषणा केली होती.

या योजनेंतर्गत देशात सौर ऊर्जा अधिकाधिक वाढवण्यात येणार आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील ७ शहरांना सुद्धा मिळणार आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, लातूर, नाशिक आणि पुणे या शहरांचा यात समावेश आहे. या योजनेंतर्गत मार्चअखेर या शहरांमध्ये प्रत्येकी २५ हजार सोलर रूफ टॉप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेंतर्गत घरगुती ग्राहकांच्या छतावर सोलर रूफ टॉप बसवून सौरऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना वीज बिलातून दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळणार आहे.
 
केंद्र व राज्य सरकारतर्फे सौर ऊर्जेवर अधिकाधिक भर देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात प्रधानमंत्री यूर्योदय योजनेचाही समावेश आहे. केंद्रीय अर्थंमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशात एक कोटी कुटुंबांच्या घरावर सौर यंत्रणा बसवण्याचे जाहीर केले. यामुळे देशातील ऊर्जेची मोठी गरज भरून निघेल. महाराष्ट्रालाही त्याचा मोठा लाभ मिळेल.
विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनी

Web Title: One crore families will have rooftop solar systems 7 cities of Maharashtra will also get benefit

टॅग्स :nagpurनागपूर