आमदार, खासदार, अधिकाऱ्यांकडून विकासकामांत अडथळा; गडकरींकडून परखड शब्दांत खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 10:44 IST2022-10-15T10:43:42+5:302022-10-15T10:44:18+5:30

अधिकाऱ्यांचे पत्नीपेक्षा फाइलवर प्रेम जास्त

obstruction of development work by MLAs, MPs and officials; Nitin Gadkari scolded | आमदार, खासदार, अधिकाऱ्यांकडून विकासकामांत अडथळा; गडकरींकडून परखड शब्दांत खरडपट्टी

आमदार, खासदार, अधिकाऱ्यांकडून विकासकामांत अडथळा; गडकरींकडून परखड शब्दांत खरडपट्टी

नागपूर : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी खासदार, आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. महाराष्ट्रातील अनेक आमदार, खासदार आपला प्रभाव वापरून विकासकामे थांबवतात, तर कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराशिवाय फाइल पुढे सरकत नाही. अशा अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना निलंबित करण्यात आले पाहिजे, असे ते म्हणाले.

चिटणवीस सेंटर येथे ‘वेद’तर्फे आयोजित ‘मिन्कॉन’ या खाण प्रदर्शन आणि संमेलनाच्या उद्घाटन समारंभात गडकरी बोलत होते. आपल्या घरासमोर बांधलेल्या रस्त्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, यासाठी त्यांनी ११ वर्षांत ३० बैठका घेतल्या. मात्र अधिकारी आले तर लाज वाटते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर न्याय मिळाला. अधिकाऱ्यांना पत्नीपेक्षा फाइल जास्त आवडते. फायली अशाच राहतात. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्या कामगिरीचे ऑडिट व्हायला हवे, असे गडकरी म्हणाले.

यावेळी गडकरी यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या कानपिचक्या काढल्या. पाच नवीन कोळसा खाणी बांधल्या जात असल्याचे अनेक वर्षांपासून ऐकत आहोत; परंतु आजपर्यंत तसे झालेले नाही. अधिकाऱ्यांची भूमिका नकारात्मक आहे. त्यामुळे अनेक कोळसा खाणींचा लिलाव झाला; पण भूसंपादन होऊ शकले नाही. ब्लॅकमेलिंगदेखील होत आहे. खाण कंपन्यांना परवानगी देण्यासाठी कालमर्यादा असावी. सध्या या कामात दिरंगाई आणि भ्रष्टाचार होत आहे, असे गडकरी म्हणाले. हा कार्यक्रम फोटो काढण्यासाठी नसावा, या शब्दांत त्यांनी आयोजकांनादेखील टोला मारला.

वाघ ताडोबात मात्र खाण उमरेडची बंद

गडकरी म्हणाले की, ताडोबात वाघ आहेत. मात्र त्यामुळे उमरेडची मुरपार खाण बंद आहे. हा एक विचित्र निर्णय आहे. मुरपारमध्ये क्वचितच वाघ आला असेल. विकासकामे आणि उद्योग उभारणीत वन व पर्यावरण परवानगी मिळण्यात मोठी अडचण होते.

आणखी काय म्हणाले गडकरी ?

- वेकोलिने घोषित केलेल्या कॅलोरीफिक व्हॅल्यू कोळशात आढळल्यास ते शिक्षा भोगण्यास तयार आहेत.

- विजेशिवाय उद्योग नाही, उद्योगाशिवाय विकास नाही. अशा परिस्थितीत हरित ऊर्जा आवश्यक आहे.

- स्वावलंबी भारतासाठी कोळशाचे उत्पादन वाढवावे लागेल.

- खनिजे कोळसा आयात करतात, मग भारत स्वावलंबी कसा होईल.

- त्यांनी मंत्र्यांना सांगितले की सरकार त्यांचे आहे. लोक त्याला कामाबद्दल विचारतील, अधिकाऱ्यांना नाही.

Web Title: obstruction of development work by MLAs, MPs and officials; Nitin Gadkari scolded